Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

'गोदावरी'च्या प्रदूषणमुक्तीसाठी नाशकात आता 'मिठी पॅटर्न'

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबईतील (Mumbai) मिठी नदीला (Mithi River) पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आयआयटीने (IIT-M) पुढाकार घेतला, त्याच धर्तीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या चार उपनद्यांसह ६७ नैसर्गिक नाल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेतली जाणार आहे. आयआयटी मुंबईतर्फे लवकरच या सर्व नद्या व नाल्यांचे सर्वेक्षण करून त्या संदर्भातील तांत्रिक अहवाल सादर केला जाणार आहे.

नाशिक शहरातून गोदावरी ही प्रमुख नदी जाते. या नदीला शहरात नंदिणी, अरुणा, वालदेवी, सरस्वती या नद्या मिळतात. या नद्या पूर्णपणे शहरातून वाहत असून या नद्यांवर अतिक्रमण करून त्यांचे पात्र अरुंद केल्याने त्यांना नाल्याचे स्वरुप आले आहे. याशिवाय नाशिक शहरातून अनेक नैसर्गिक नाले वाहत असून, हे सर्व नाले महापालिकेने बंदिस्त केले आहेत. मात्र, शहरात एकाच वेळेस जोरदार पाऊस पडल्यानंतर या नाल्यांमधील पाणी बाहेर पडून शहरातील गल्ल्यांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवत असते. तसेच बऱ्याच ठिकाणी हे या नाल्यांमधील सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते. यामुळे या नदी नाल्यांच्या प्रदूषणाचा तसेच त्यांच्यामधून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी शुक्रवारी (ता. ६) आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मुंबईतील मिठी नदीला २००८ मध्ये पूर आल्यानंतर या नदीचे प्रदूषणाचे भीषण स्वरूप समोर आले. मुंबई महापालिकेने नदी स्वच्छ करण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यानंतर मुंबई आयआयटीकडून सर्वेक्षण करून मिठी नदी स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मिठी नदीच्या धर्तीवरच गोदावरी नदीच्या उपनद्यांना देखील पुनर्वैभवप्राप्त करून दिले जाणार आहे.

नमामि गोदा प्रकल्प तसेच स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेला 'प्रोजेक्टगोदा' अंतर्गत गोदावरी नदीचे सुशोभीकरण व प्रदूषण मुक्ती केली जाणार आहे. मात्र, नंदिनी, वालदेवी, वरुणा व सरस्वती याचार उपनद्यांच्या दुरवस्थेचे चित्र बदलण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना हाती घेतलेली नाही. त्यामुळे या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्यांच्यातील सांडपाणी गोदावरीत मिसळणे बंद करण्यासाठी आता आयआयटीमार्फत काम केले जाणार आहे. मुख्यत्वे करून उपनद्यांमध्ये मिसळणारे सांडपाण्याचे नाले मलनिस्सारण केंद्राला जोडणे व उपनद्यांच्या काठी सौंदर्यीकरण करणेही महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. ही कामे कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.