Jalyukt Shivar 2.0
Jalyukt Shivar 2.0 Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Jalyukta Shivar 2.0 : नाशिक विभागाला 850 गावांचे उद्दिष्ट

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्य सरकारने जलयुक्त शिवार 2.0 योजना जाहीर केली असून, पुढील आर्थिक वर्षापासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेच्या पूर्वतयारीला सुरवात झाली असून नाशिक विभागात यापूर्वी जलसंधारणाची कामे झालेली गावे वगळून या योजनेतून पहिल्या वर्षी ८५० गावांची निवड केली जाणार आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्या जिल्हयांमधील गावांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येप्रमाणे गावांची निवड करून राज्य सरकारकडे पाठवण्याच्याही सूचना केल्या आहेत.

राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची ६ लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण केली आहेत. या योजनेतून २७ लाख टीएसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात आल्या. यामुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली व राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा दिसून आला आहे. सध्याच्या सरकारने पुन्हा जलयुक्त शिवाय अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे.

नवीन योजनेनुसार प्रत्येक गावाचा जलआराखडा तयार करून त्यानुसार गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत. तसेच पाणी साठवण्यासाठी शेततळे उभारणे, प्लॅस्टिक अस्तरीकरण करून पाणी साठवणे, सूक्ष्मसिंचन, मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्वाने सिंचन व्यवस्था करणे, पाणी साठवलेल्या प्रकल्पांवर पाणी वापर संस्थांप्रमाणे शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन व्यवस्थापन करणे आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. नव्या योजनेतून जलसाक्षरतेला प्राधान्य दिले जाणार आहे. या जलसाक्षरतेमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.

याबाबत गावांची निवड करणे, आराखडे तयार करणे आदींबाबत यापूर्वीच जलसंधारण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला असून त्याच आधारावर विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सूचना दिलेल्या आहेत. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांसाठी ८५० गावांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात २१०, नगरमधून २४०, जळगावमधून २४५, धुळ्यामधून ७० व नंदूरबार जिल्हयातून ८५ गावांची निवड करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अशी होणार निवड
जलयुक्त शिवार २.० या योजनेतून गावांची निवड कशी करावी, याबाबत विभागीय आयुक्तांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम) नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प व आदर्श गाव इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजने अंतर्गत जलसंधारणाची कामे पूर्ण झालेली गावे या योजनेतून वगळायची आहेत. त्यानंतर उर्वरित गावांपैकी अवर्षण प्रवण तालुक्यातील गावे, भूजल सर्व्हेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, अपूर्ण पाणलोट असलेल्या गावांची निवड प्राधान्यक्रमाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.