Pune-Nashik Highspeed
Pune-Nashik Highspeed Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे : मार्ग बदलल्याने भूसंपादन केलेल्या 45 हेक्टर जमिनीचे करायचे काय?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग व्यवहार्य करण्यासाठी तसेच डोंगर भागातील बोगद्यांचा खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकारने हा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यामुळे सिन्नर तालुक्यातील रेल्वे मार्ग बदलणार आहे. परिणामी यापूर्वी या हायस्पीड रेल्वेसाठी संपादित केलेल्या ४५ हेक्टरचे करायचे काय, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे. भूसंपादनापोटी संबंधित शेतकऱ्यांना ५९ कोटी रुपये वितरीतही केले आहेत. त्यामुळे हे पैसे परत घ्यायचे की दुसरा काही पर्याय शोधायचा याविषयी विचारविनिमय सध्या चालू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार नाशिक-शिर्डी-पुणे रेल्वेसाठीचा केंद्रिय समितीकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे मार्ग 2021 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला असून तो महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनतो उभारला जाणार आहे. या मार्गासाठी साधारण 16 हजार कोटी रुपये खर्च येणार असून त्यातील प्रत्येकी दहा टक्के खर्च राज्य व केंद्र सरकार करणार असून उर्वरित खर्च कर्ज उभारून केला जाणार आहे. त्यानुसार महारेल कंपनीने भूसंपादन विभागाच्या मदतीने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत या प्रकल्पासाठी  ४५ हेक्टर भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मार्गात बदल करण्याची घोषणा केली असली तरी जिल्हा प्रशासन याबाबत अंधारात आहे. संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात दिलेल्या मोबदल्याचे  काय करायचे यासंदर्भात कोणतेही निर्देश अद्याप शासनाकडून देण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन याबाबत सरकारच्या निर्देशाची वाट बघत आहे.

‘महारेल’ने नाशिक व सिन्नर तालुक्यातील २२ गावांमधील सुमारे २८७ हेक्टर जमीन खरेदी करणे प्रस्तावित केले असून त्यासाठी २५० कोटींच्या निधीपैकी जिल्हा प्रशासनाने १०० कोटींची मागणी नोंदवली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ४५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून त्याकरिता संबंधित जमीन मालकांना ५९ कोटी रुपये मोबदला दिला आहे. मात्र, आता या रेल्वेचा मार्गच बदलल्याने जमीन मालकांना देण्यात आलेला मोबदला परत मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. मार्ग बदलाबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. 

या कारणामुळे बदलला मार्ग 

नाशिक ते पुणे रेल्वेमार्ग हा २३५ किलोमीटरचा आहे. आता हा मार्ग ३३ किलोमीटरने वाढणार असून, त्याला शिर्डी जोडले जाईल, असा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या मार्गावर १२ ते १६ कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे. विद्यमान मार्गावर एकूण २० स्टेशन आहे. १८ बोगदे आणि १९ उड्डाणपुल आहेत. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाचा खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. यामुळे या दोन शहरांसाठीच असलेला रेल्वेमार्ग व्यवहार्य होत नाही, यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गाला मान्यता मिळत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ही रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. यामुळे मुंबई शिर्डी अंतर कमी होऊन हा प्रकल्प व्यवहार्य होणार आहे.

नाशिक ते पुणे रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत ४५ हेक्टरचे भूसंपादन  करण्यात आले आहे. दरम्यान या मार्ग बदलल्याबाबत महारेलकडून कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. नाशिक जिल्ह्यात फार बदल आवश्यक वाटत नाही. शिर्डीला जाणारा रस्ता हा अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे

- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक