Uday Samant
Uday Samant Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या आयटी पार्कला अखेर 'येथे' 50 एकर जागा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचिमध्ये नाशिक तालुक्यातील राजूर बुहला येथे आयटीपार्कसाठी ५० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून आडगाव, अक्राळे की राजूर बुहले अशा चर्चेत असलेल्या नाशिकच्या आयटीपार्कला अखेर कागदोपत्री जागा निश्चित झाली आहे. असून आता या ठिकाणी प्रत्यक्षात आयटी पार्क होण्यासाठी कार्यवाही कधी सुरू होणार याची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मागील ऑक्टोबरमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या  बैठकीत नाशिक तालुक्यातील राजूर बाहुला येथे आयटी पार्कसाठी दोन टप्प्यात शंभर एकर जागा आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. खासदार हेमंत गोडसे यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर या आठवड्यात उद्योग विभागाच्या अधिसूचिमध्ये राजुलबहुला येथे आयटीपार्कसाठी ५० एकर जागा आरक्षित करण्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सुरुवातीला नाशिक महापालिका हद्दीलगत आडगाव शिवारात ३३० एकर जागेचा प्रस्ताव त्यानंतर स्वत: उद्योगमंत्र्यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीत आयटी पार्कसाठी १०० एकर जागा आरक्षित ठेवण्याची घोषणा या बाबी मागे पडल्या असून आता नाशिकचे आयटी पार्क राजूरबहुला येथेच होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिक येथे आयटी पार्क नसल्याने स्थानिक तरुणांना पुणे,बंगलोर आदी मोठ्या शहरांमध्ये जावं लागते. यामुळे  नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी नाशिक महापालिकेचे तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी २०२२ मध्ये एक परिषद घेऊन आयटी पार्कसाठी आडगाव शिवारात जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. पुढे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या आयटी पार्कचा विषय मागे पडला. दरम्यान मधल्या काळात नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिकचा आयटी पार्कचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान याच काळात  आयटी पार्क व्हावे यासाठी खासदार गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार उद्योमंत्र्यांनी उद्योग विभागाची बैठक घेतली.

('टेंडरनामा'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैठकीत आयटी पार्कसाठी जागा आरक्षित करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी खासदार गोडसे आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नाशिक तालुक्यातील राजूर बहूला येथे आयटीसाठी दोन टप्प्यात शंभर एकच जागा आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली होती. त्यानंतर या बैठकीतील निर्णयानुसार उद्योग विभागाने राजूर बुहला येथे आयटीपार्कसाठी ५० एकर जागा आरक्षित केली आहे. राजूर बहुला येथे नियोजित औद्योगिक वसाहत असून त्यातील ५० एकर जागेवर आयटी पार्क उभारला जाणार आहे. अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या आयटी पार्कला आता उद्योगविभागाने जागा निश्चित केल्याने या आरक्षित जागेचे लवकरात लवकर भूसंपादन होऊन तेथे पायाभूत सुविधा उभारण्यासाठीही प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.