Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : आयआयटी रुरकीच्या पथकाने केली मलनिस्सारण पथकाची पाहणी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : शहरातील जुन्या मलजलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता कमी झाली असून वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी चार नवीन मलनिस्सारण केंद्रही प्रस्तावित केले आहेत. त्यासाठी ५३० कोटीचा आराखडा केंद्र शासनास पाठवला आहे. हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी आयआयटी रुरकी येथील तज्ज्ञांच्या पथकाने शहरातील सर्व मलनिस्सारण केंद्र व मलजल वाहिकांची पाहणी सुरू असून त्यांनी सध्याच्या आराखड्यातील काही त्रुटी लक्षात आणून दिल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करून हा आराखडा पुन्हा सादर केला जाणार आहे.

गोदावरी प्रदूषणमुक्तीचा मुद्दा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अडचणीचा ठरू शकतो हे लक्षात घेत नाशिक महापालिकेने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाला  ५३० कोटींचा मलनिःसारण आराखडा प्रस्तावित केला आहे. गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाने उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठित करण्यात आली आहे. या समितीने गोदाप्रदूषण रोखण्यासाठी मुख्य प्रवाहात मिसळणाऱ्या नैसर्गिक नाल्यांच्या शुद्धीकरणाची शिफारस केली आहे. त्यासाठी पालिकेने १९ नैसर्गिक नाल्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रक्रियेला सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, शहरातील सांडपाणीही गोदावरीत मिसळत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. वास्तविक, शहरातील कोणत्याही मिळकत, इमारत वा जमीनीतून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडले जाणे नियमाने बाध्य आहे. त्यासाठी पालिकेने ८ सिव्हरेज झोन तयार केले असून शहरातील सांडपाणी सुमारे २ हजार किमी लांबीच्या मलवाहिका १८ पपींग स्टेशनद्वारे मलजलशुद्धीकरण केंद्रांत आणून सोडले जाते. हे सांडपाणी तपोवन, आगरटाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर वपिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रांत आल्यानंतर,प्रक्रिया करून नदीपात्रात सोडले जाते. मात्र, ही व्यवस्था जुनी झाली असून आता जुन्या मलजलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता कमी झाली असून वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर चार नवीन मलजल शुद्धीकरण केंद्रही प्रस्तावित केले आहे. त्यासाठी ५३० कोटीचा आराखडा केंद्र शासनास पाठवला आहे. या प्रस्तावाच्या तांत्रिक तपासणीसाठी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत शासनाने नियुक्त केलेल्या आयआयटी  रूरकीच्या तज्ञांच्या पथकाने संयुक्त चाचपणी सुरू केली आहे. या पथकाने काही महत्त्वाचे बदल सुचवले असून त्यानंतर आराखडा मंजुरीसाठी वेग दिला जाणार आहे. आयआयटी रूरकीचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. अरुणकुमार व प्रा. राणा यांनी पालिकेच्या तपोवन, आगरटाकळी, चेहेडी व पंचकयेथील मलनिःसारण केंद्रांची पाहणी केली. शहरातीलभुयारी गटार योजनेची संपूर्ण माहितीही मागवली आहे.