IIT Mumbai
IIT Mumbai Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : तीनशे कोटींच्या मलनिस्सारण केंद्राचे भवितव्य IIT पवईच्या हाती

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या तपोवन व आगर टाकळी मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढवण्यासाठी सादर केलेल्या तीनशे कोटींच्या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मान्यता दिली आहे. मात्र, या आराखड्यास आयआयटी पवईची मान्यता घेण्याची अट घातली आहे. त्यामुळे सरकारच्या अंतिम मंजुरीपूर्वी नुतनीकरण आराखडा आयआयटी पवईकडे तांत्रिक तपासणीसाठी पाठवावा लागणार आहे. आयआयटी पवईची मान्यता मिळाल्यानंतर अमृत-२ योजनेंतर्गत नुतनीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिक  महापालिकेचे सिव्हरेज झोन आठ क्षेत्रात विभागले आहे. त्यानुसार रहिवासी भागातील तयार होणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुमारे १९१९ किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्यात आल्या आहेत. नागरी वस्त्यांमधील सांडपाणी मलनिस्साण केंद्रांपर्यंत वाहून नेण्यासाठी १८ पंपिंग स्टेशन आहेत. या सर्व मलनिस्सारण केंदांमध्ये सुमारे ३५० एमएलडी ( रोज दशलक्ष लिटर) पाण्यावर प्रक्रिया केली जाते. सद्यःस्थितीत तपोवन, आगर- टाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर व पिंपळगाव खांब या सहा ठिकाणी मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह भविष्यात शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिकेने केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत तपोवन व आगर टाकळी मलनिस्सारण प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी जवळपास तीनशे कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या प्रस्तावाला तांत्रिक मान्यताही दिली आहे. मात्र, या आराखड्यास आयआयटी पवईची मान्यता घेण्याची अट बंधनकारक केली असून तसे पत्र महापालिकेला पाठवले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत महापालिकेने चार मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमता वाढीसाठी ५३० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत टाकळी व तपोवन या दोन केंद्रांच्या क्षमता वाढीचा ३३२ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता.  तपोवन मलनिस्सारण केंद्राची क्षमत‍ा ३९८ एमएलडी असून नुतनीकरणाद्वारे ती ५५० एमएलडीपर्यंत वाढवली जाईल. त्यासाठी १६६ कोटी रुपये खर्च येईल. आगर टाकळीची क्षमता ८१ एमएलडी असून त्याची क्षता १५० एमएलडीपर्यंत वाढ केली जाणार आहे. त्यासाठी १३८ कोटी निधीची आवश्यकता आहे. तांत्रिक मंजुरीमुळे या प्रकल्पांच्या नुतनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.