Toll
Toll Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्थानिक वाहनांची सवलत रद्द; वाहनचालकांमध्ये...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या पिंपळगाव बसवंत या टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ व एमएच ४१ या वाहनांना असलेली टोलसवलत रद्द करण्यात आली आहे. हा टोलनाका सरकारच्या ६० किलोमीटर अंतराची नियमावली डावलून विकसित करण्यात आलेला आहे. यामुळे या टोलनाक्यावर नाशिक जिल्ह्यातील वाहनांना सवलत होती. मात्र, आता ही सवलत रद्द केल्याने वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्हयात घोटी, पिंपळगाव बसवंत व चांदवड असे तीन टोलनाके आहेत. ठाणे जिल्ह्यातील पडघ्यानंतर जवळपास ६० किलोमीटरवर घोटी येथे टोल नाका असून त्यानंतर पुन्हा ६० किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत येथे टोल नाका आहे. त्यानंतर केवळ ३५ किलोमीटर अंतरावर चांदवड येथे टोल नाका आहे. मुंबईहुन नाशिकपर्यंत केवळ दोन टोल नाके असल्याने त्याची भर काढण्यासाठी पिंपळगाव व चांदवड येथे न टोलनाक्यावर अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जाते. नाशिकहून चांदवड, मनमाड, मालेगाव येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना केवळ ६० किलोमीटरसाठी ३८५ रुपये टोल भरावा लागतो. यात पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चारचाकी वाहनाला २२० रुपये व चांदवड टोल नाक्यावर १६५ रुपये टोल आकारला जातो.

पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर नाशिक जिल्हयात प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या म्हणजे एम एच १५ व एम एच ४१ या वाहनांना सवलत असून ४० रुपये टोल आकारण्याची सवलत देण्यात आली होती. मात्र, ही सवलत अचानकपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोषाची भावना आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील नाशिक जिल्ह्यातील वाहनांना देण्यात येणारी टोल सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच पिंपळगाव बसंवत टोल नाक्यावरील प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात यासाठी  नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसंवत टोल नाक्यावरील मनमानी कारभाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी भाऊसाहेब साळुंखे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत भाऊसाहेब साळुंखे यांनी दखल घेऊन या प्रकरणात मदत करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष पी.एम.सैनी आदी उपस्थित होते.

कायम वादातील टोलनाका
पिंपळगाव टोल नाका विकसित करण्यात आल्यापासून येथील स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नेहमीच वादात राहिलेला आहे. स्थानिक वाहणांची नोंदणी करण्यास सुद्धा तांत्रिक अडचणी सांगून टाळाटाळ केली जाते. आजवर याठिकाणी अनेक वादाच्या घटना घडलेल्या आहे. अगदी लोकप्रतिनिधी पासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वादाच्या घटना घडल्याने हा टोल वादात सापडलेला आहे.