Mantralaya
Mantralaya Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिन्नरचा दुष्काळ हटवणारा 7500 कोटींचा डीपीआर सरकारला सादर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यातील सिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणारा व ५.६ टीएमसी क्षमतेचा दमणगंगा-वैतरणा-कडवा-देव नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऍथॉरिटीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार हा नदीजोड प्रकल्प ७५०० कोटी रुपयांचा असून त्यामुळे सिन्नर तालुक्यांतील १३ हजार ८०० हेक्टर सिंचन होणार आहे. याशिवाय दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्याची राज्यभरातील दुष्काळी परिस्थिती बघता हा प्रकल्प लवकरच मार्गी लागू शकतो.

सिन्नर हा गोदावरी खोऱ्यात असूनही समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवर असल्यामुळे गोदावरीच्या पाणी वाटपासून कायम वंचित राहिले. सरासरी ४०० मिमी वार्षिक सरासरी असलेल्या सिन्नर तालुक्यात कायम दुष्काळी परिस्थिती असते. यावर तोडगा म्हणून  दमणगंगा-वैतरणा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी बंदिस्त जलवाहिनीतून लिफ्टद्वारे उचलून सिन्नरला नेणे हा एकमेव पर्याय असल्याची बाब सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मांडली होती. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी राजेंद्र जाधव यांच्या सहकार्याने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्र व राज्याच्या परवानगी मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मागील चार वर्षांपासून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सर्वसमावेशक व्हावा, यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.

नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दमणगंगा व वैतरणा खोर्यातील निळमाती, मेट, कोशिमशेट, उधळे येथे बंधारे बांधणे. ऊर्ध्व वैतरणा-कडवा ते बोरखंड धरणांचा उपयोग करून पाणी वळविणे. या चार जलाशयांमधील पाणी वैतरणा धरणात आणून तेथून २८ किलोमीटर पाइपने कडवा धरणात टाकणे. बोरखिंड ते देवनदीदरम्यान पाइपलाइन व बोगद्याद्वारे पाणी सिन्नर तालुक्यात देवनदीच्या उगमस्थानापर्यंत आणून तेथून ते सिन्नरच्या पूर्वभागापर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पाणी उचलण्यासाठी लागणार्या विजेची गरज भागवण्यासाठी १३० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा खर्चही या सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.

असा होणार पाणी वापर
सिंचनासाठी : ३६०० दलघफू
पिण्यासाठी : ८४७ दलघफू
 उद्योगासाठी : ८३८ दलघफू

लवकरच बैठक
सविस्तर प्रकल्प अहवाल जलसंपदा विभागास सादर झाला असून आता मुख्यमंत्री एकानाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत पुढील कार्यवाहीसाठी बैठक घेणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

असा आहे प्रकल्प
प्रकल्पाची एकूण लांबी ८३.२ किलोमीटर
उर्ध्वगामी जलवाहिनीची लांबी : ४१.६९ किमी
बोगद्यांची लांबी १६.९४
विजेची गरज : १२६ मेगावॅट
पाणी उपलब्धता : ५६०० दलघफू
भूसंपादन : १३९४  हेक्टर