Traffic Jam
Traffic Jam Tendernama
पुणे

पुणे-नाशिक महामार्गाची वाट कोणी लावली? जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-नाशिक (Pune-Nashik Highway) महामार्गांवर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिक, कामगारांतून ऐन दिवाळीच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पुणे-नाशिक महामार्गांवर मेदनकरवाडी, नाणेकरवाडीच्या (ता. खेड) हद्दीत बुधवारी (ता. १९) पावसामुळे मार्गावर पाणी साचल्याने चौदा तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. कामगार, नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आदींचे प्रचंड हाल झाले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मार्गावर पाणी साचत असलेल्या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महामार्गाच्या कामाच्या बाबतीत प्रशासन तत्पर होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर तसेच खुल्या स्वरूपातही संताप व्यक्त केला. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या वाहतूक ठप्पतेवर व या मार्गाच्या अवस्थेबाबत तसेच नेत्यांबद्दल ही काही कमेंट सोशल मीडियावर केल्या आहेत. त्यातून नेत्यांनी व संबंधितांनी धडा घेणे गरजेचे आहे. काही नेटकऱ्यांनी कंपन्या येथून गेल्या तर बोंबलत बसा असाही सूचक इशारा दिला आहे. यासाठी चाकणकरांनी आंदोलन केले पाहिजे असेही सांगितले आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा, नगर या भागांना जोडण्यासाठी हा नाशिक महामार्गामहत्त्वाचा आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच अवजड वाहनांची वर्दळ असते. पावसामुळे या महामार्गावर मेदनकरवाडी, नाणेकरवाडी या गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेले. महामार्गावर सखल भागात अगदी चार ते पाच फुटावर पाणी आले होते. वाहतूक विभागाच्या वतीने पाणी काढण्याचे प्रयत्न झाले. जेसीबी आणून चर खोदण्यात आले. परंतु चाकण इंडस्ट्रीज असोसिएशनची पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा वाहिनी तेथे जवळ असल्याने ती फुटली गेली त्यातील पाणीही मार्गावर आले आहे. या पुणे नाशिक महामार्ग मेदनकरवाडी,नाणेकरवाडीच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपा समोर अगदी चोवीस तास पाण्याखाली जातो.

रिलायन्स पेट्रोल पंपा समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ते पाणी काढण्यासाठी जेसीबी मशिनच्या सहाय्याने चर काढून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु चाकण इंडस्ट्रीज असोसिएशनची पाणीपुरवठा वाहिनी फुटल्यामुळे तेही पाणी मार्गावर येत आहे. त्यामुळे पाणी वाढले आहे कमी होत नाही.
- शंकर डामसे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग