7/12
7/12 Tendernama
पुणे

Digital 7x12 किऑस्क पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळेना

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शेतकऱ्यांना जुने सातबारा आणि आठ ‘अ’चे उतारे कमी श्रमात आणि कमी पैशात सहजासहजी उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील हवेली तहसील कार्यालयात (मामलेदार कचेरी) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेले सातबारा उताऱ्यासाठीचे किऑस्क (Digital 7x12 Kiosk) मशिन मागील तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पूर्वीप्रमाणे जुन्या सातबारा उताऱ्यांसाठी तहसील कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

तालुक्यातील सुमारे ६० हजार शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहेत. शिवाय या किऑस्क मशिनमुळे हाताला काम मिळालेले तीन कामगारही बेरोजगार झाले आहेत. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचे सातबारा उतारे लागत असतात. परंतु ऐन खरिपाच्या तोंडावर हे किऑस्क मशिन बंद करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

केंद्र सरकारच्या अक्षय अभिलेख केंद्राच्या नॅशनल लँड रेकॉर्डस मॉडर्नायझेशन प्रोग्रामअंतर्गत (एनएलआरएमपी) महसूल विभागातील अभिलेख स्कॅनिंग या पथदर्शी प्रकल्पासाठी हवेली तालुक्याची निवड करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी तत्काळ हे मशिन बसवले होते. या मशिनमध्ये हवेली तालुक्यातील सन १९३० ते २०१२ या ८२ वर्षांच्या कालखंडातील शेतीविषयक सर्व अभिलेख आणि जमीन नोंदणीविषयक अन्य सर्व अभिलेख स्कॅन करून ठेवलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना या कालावधीतील कोणताही उतारा अगदी १५ रुपयांमध्ये तत्काळ मिळत असे.

दरम्यान, हे किऑक्स मशिन काही तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन-तीन महिन्यांपासून बंद करावे लागले आहे. मात्र ते पुन्हा पुर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.

प्रतिदिन सुमारे २०० सातबारा उताऱ्यांचे वाटप
या मशिनमुळे प्रतिदिन सुमारे २०० शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा आणि आठ अ चा उतारा अगदी कमी वेळेत आणि कमी पैशात उपलब्ध होत असे. शिवाय यातून महसूल विभागालाही उत्पन्न मिळत असे. हे मशिन चालविण्याचे काम एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी या कंपनीला तीन महिन्यांपासून हे काम थांबविण्यास सांगितले आहे. तहसीलदारांच्या आदेशामुळे सध्या हे मशिन बंद असल्याचे उताऱ्यासाठी आलेल्या काही शेतकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

‘तीन कामगार बेरोजगार’
हे मशिन चालविण्यासाठी ज्या खासगी कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. त्या कंपनीने तीन कामगारांची नियुक्ती केलेली आहे. मशिन बंद करण्यात आल्याने हे तीन कामगारही सध्या बेरोजगार झाले आहेत.