Gharkul Yojana
Gharkul Yojana Tendernama
पुणे

घरकुल परत जाऊ नये म्हणून 'या' ग्रामपंचायतीने काय केले पाहा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जागेअभावी घरकुले परत जातात किंवा जागा असते पण खरेदीदर परवडणारा नसतो. त्यामुळे लाखो लोक बेघर आहेत. करंजेपूल गावाने यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

एक गुंठ्यात एकच घरकुल असेच आतापर्यंतचे गृहितक होते. परंतु एक गुंठ्यात दोन-तीन घरकुले मजल्यावर मजले चढवून बांधता येतात हे करंजेपूल (ता. बारामती) ग्रामपंचायतीने सिध्द केले आहे. बहुमजली घरकुलाच्या अनोख्या प्रयोगासाठी राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागाने करंजेपूल ग्रामपंचायतीस 'सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत' असा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन नुकतेच गौरविले आहे.

गावातील सुरेश व अनुसया गायकवाड या दांपत्याने स्वतःच्या मालकीच्या एका गुंठ्यात कॉलम टाकून रहायला छोटी खोली बांधली आणि पुढच्या गाळ्यात किराणा दुकान सुरू केले. त्यांची तीन मुले चहाचे हॉटेल चालवतात. लग्नानंतर मुलांच्या राहण्यासाठी घरकुलांची गरज भासू लागली. सुरेश यांना एक आणि मोठा मुलगा संभाजी यांना एक घरकुल मंजूर झाले. पण जागाच नसल्याने घरकुल परत जाण्याची वेळ आली. यावर सरपंच वैभव गायकवाड व तत्कालीन ग्रामसेवक आबासाहेब यादव यांनी राज्यातील पहिला प्रयोग करायचे ठरविले.

किराणा दुकानाच्या मजल्यावर दुसरा आणि तिसरा मजला घरकुल योजनेतून बांधायचा निर्णय घेतला. सुरेश गायकवाड यांच्या नावावरील गुंठ्यात संभाजीला घर बांधण्यास प्रतिज्ञापत्राव्दारे संमती दिली. एकाच कुटुंबातील असल्याने प्रस्ताव बनविणे शक्य झाले. दुमजली घरकुलाची संकल्पना घेऊन सरपंच, ग्रामसेवकांनी सहा-सात महिने कागदोपत्री नियमांमध्ये बसविण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेत चकरा मारल्या. गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी वर्गाने हिरवा कंदील दाखविल्यावर इंदिरा आवास योजनेतून आधीच्या मजल्यावर आणि दोन घरकुलांचे दोन मजले चढले.

राज्याच्या ग्रामविकास विभागानेही मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आदींच्या हस्ते वैभव गायकवाड, गटविकास अधिकारी अनिल बागूल यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत हा पुरस्कार नुकताच प्रदान केला.

एकाच कुटुंबातील दोघे असल्याने संमतीपत्रावर दोन घरकुले मंजूर झाली. घरकुलाच्या जागेसाठी प्रत्येकी पन्नास हजार मिळतात. दोघा-तिघात मिळून एक गुंठा घेणे परवडू शकते. जागा खरेदी केली किंवा कुलमुखत्यार केले तर तीनमजली घरकुल बनू शकते. कागदोपत्री नियमात बसवून बहुमजली घरकुल बांधणे ही राज्याला दिशादर्शक बाब असल्याने पुरस्कारासाठी विचार झाला.
- वैभव गायकवाड, सरपंच, करंजेपूल, ता. बारामती, जि. पुणे