Katraj Chowk Flyover
Katraj Chowk Flyover Tendernama
पुणे

Pune : कात्रज चौकातील प्रवास का बनलाय धोकादायक?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज चौकात सुरू असलेल्या सहापदरी उड्डाण पुलाच्या (Katraj Chowk Flyover) संथगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic) नित्याचीच होत बसली असून, प्रशासनाकडून कोणत्याही तातडीच्या उपाययोजना होताना दिसत नाहीत.

२४ सप्टेंबर २०२१ मध्ये या उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्याला आता जवळपास अडीच वर्षे होत आहेत. कामाची मुदत २४ फेब्रुवारी २०२४ ला संपणार आहे. मात्र काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. काही खांबांची कामे अपूर्ण अवस्थेत आहे, तर गर्डर टाकण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे.

या अर्धवट अवस्थेत असलेल्या आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चौकात रहदारी असते. मुंबईहून सोलापूरकडे आणि शहरातून सातारा, कोल्हापूर, सांगली, गोवा आदी भागात जाण्यासाठी या चौकातून जावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

दोन वर्षांत उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईल आणि ही कोंडी सुटेल, असा विश्वास नागरिकांना होता. मात्र अर्धवट कामांमुळे आणखी बराच काळ नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाण पुलावरून माउली गार्डनजवळ जाणार होती. परिणामी, वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र कामाला गती देण्याऐवजी रखडपट्टीच जास्त झाल्याचे दिसून येते.

सुरक्षेच्या उपाययोजनांना फाटा

उड्डाण पुलाचे काम सुरू असताना प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. दिशादर्शक फलक, गती नियंत्रणााठी रम्बलर, गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना अधिकचे वॉर्डन, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसण्यासाठी रिफ्लेक्टर लावणे, बॅरिकेडिंग करणे अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र त्या कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

अडीच वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन झाले. पुढील दोन ते तीन वर्षांत हा पूल पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज होता. परंतु संथ गतीने चाललेल्या कामामुळे वाहतूक कोंडी सुटायची सोडून अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या कामाला गती द्यावी.

- बाळासाहेब गदळे, स्थानिक नागरिक

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपायोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जागेचा ताबा मिळण्यास विलंब झाल्याने काम पूर्ण होण्यास उशीर झाला आहे. मात्र तरीही त्यातून मार्ग काढत काम सुरू असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

- महेश पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग