Sewage Project
Sewage Project Tendernama
पुणे

पुण्यातील १० मैलाशुद्धीकरण प्रकल्प कालबाह्य; आता नेमणार सल्लागार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुळा-मुठा (Mula-Mutha) नदीत येणारे मैलापाणी शुद्ध करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी पुणे शहरात १० मैला शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले आहेत. मात्र, केंद्रीय प्रदूषण मंडळाने निकष बदलल्याने हे एसटीपी केंद्र कालबाह्य झाले आहेत. नव्या निकषानुसार नदीतील पाणी जास्त स्वच्छ करण्यासाठी बीओडी १० मिलीग्रॅम आणि सीओडी ५० मिलीग्रॅमपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. मात्र, पुण्यातील मैला शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध होणाऱ्या पाण्यात बीओडी ५० व सीओडी १००च्या पुढे आहेत. आता या प्रकल्पात बदल करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

मुळा-मुठा नदीमध्ये रोज ९९० एमएलडी मैलापाणी येत आहे, त्यापैकी सुमारे ५५० एमएलडी पाण्यावर सध्या प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते, तर उर्वरित ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम सध्या प्राथमिक अवस्थेत असून, ऑक्टोबरनंतर याचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. पुणे महापालिकेने २००८ पूर्वी शहरात १० मैला शुद्धीकरण केंद्र उभारले. त्यापैकी एक नायडू रुग्णालय येथील प्रकल्प पाडण्यात आला आहे. सध्या नऊ प्रकल्पांद्वारे नदीत येणारे मैलापाणी शुद्ध केले जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्‍चित केलेल्या निकषानुसार महापालिकेने मैलापाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अवलंबिणे आवश्‍यक असते.

नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी सुमारे वर्षभरापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मैलापाणी शुद्धीकरणाचे निकष बदलले. पण, महापालिकेने याकडे लक्ष दिले नाही. केंद्र सरकारच्या ‘नमामी गंगे’ प्रकल्पांतर्गत ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये महापालिकेचे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारून १५ ते २० वर्ष झाली आहेत. त्यांची शुद्धीकरण क्षमता कमी झाली असून, शुद्ध केलेल्या पाण्यातील ‘सीओडी’ आणि ‘बीओडी’चे प्रमाण निकषांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे भविष्यात नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी चर्चा केली असता, सध्याचे तंत्रज्ञान कालबाह्य झाले असून नव्या निकषानुसार बदल करणे आवश्‍यक आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी या सर्व प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी सल्लागार नियुक्त करून एचटीपी केंद्रात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

सीओडी म्हणजे काय?

अशुद्ध पाण्यातील रासायनिक पदार्थ्यांचे विघटन करण्यासाठी किती ऑक्सिजनची गरज आहे, यावरून केमिकल ऑक्सिजन डिमांडचे (सीओडी) प्रमाण मोजले जाते. पाण्यातील रासायनिक पदार्थ्यांच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून सीओडीचा वापर केला जातो.

बीओडी म्हणजे काय?

अशुद्ध पाण्यातील जैविक पदार्थांचे विघटन करण्यासाठी सुक्ष्म जंतूंना ऑक्सिजनची किती गरज आहे, यावरून (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचे (बीओडी) प्रमाण मोजले जाते. जेवढे बीओडीचे प्रमाण कमी, तेवढे पाणी चांगल्या दर्जाचे असते.

‘‘केंद्रीय राज्य प्रदूषण महामंडळाने मैलाशुद्धीकरण केंद्राचे निकष बदलले आहेत. त्यानिकषांची पूर्तता करणारा महापालिकेचा एकही प्रकल्प नाही. बीओडीचे प्रमाण १० मिलीग्रॅम आणि सीओडीचे प्रमाण ५० मिलीग्रॅमपर्यंत आणण्यासाठी एसबीआर नावाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्‍यक आहे. त्यानुसार बदल करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी किती खर्च येणार व कालावधी किती लागणार हे सल्लागाराचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.’’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

निकष बदलण्याचे कारण काय?

शहरीकरणामुळे नद्यांमध्ये थेट मैलापाणी येत आहे, तर कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाण्यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. मैलाशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करून नदीत सोडले जात असले, तरी त्यातून नदीचे प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले आहे. नदी कमी प्रदूषित व्हावी व शुद्ध पाण्याचे प्रमाण वाढावे यासाठी निकष बदलले आहेत. यामध्ये सीओडी, बीओडीचे प्रमाण कमी करणे, तसेच नायट्रोजन रिमुव्हल याचा नव्याने समावेश केला आहे.

मुठा नदीतील बीओडी आणि सीओडीचे प्रमाण (२०२१)

ठिकाण - बीओडी (मिलीग्रॅममध्ये) - सीओडी (मिलीग्रॅममध्ये)

विठ्ठलवाडी - ५२.११ - १३५.८०

म्हात्रे पूल - ४८.७० - १२०.८९

एरंडवणे - ५८.११ - १२७.९२

जोशी पूल - ४१.६७ - १०१.४२

ओंकारेश्‍वर - ५१.८९ - १२९.५१

रेल्वेपूल - ५०.७६ - १२७.२३

सद्यःस्थितीतील मैलाशुद्धीकरण प्रकल्प व क्षमता (एमएलडीमध्ये)

भैरोबा - १३०

एरंडवणे - ५०

तानाजीवाडी - १७

बोपोडी - १८

मुंढवा - ४५

विठ्ठलवाडी - ३२

नायडू नवीन - ११५

बाणेर - ३०

खराडी - ४०

नायडू बंद - ९०