SPPU Ganeshkhind Road
SPPU Ganeshkhind Road Tendernama
पुणे

Pune : विद्यापीठ चौकात कोंडी कायम? दुमजली उड्डाणपूल अजून स्वप्नातच

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात (आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक) दुमजली उड्डाणपूल आणि हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निश्‍चित केलेल्या नोव्हेंबर २०२४ चा मुहूर्त चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी आवश्‍यक त्या परवानगी पोलिस खात्याकडून मिळत नसल्यामुळे ही वेळ आली आहे. त्यामुळे बाणेर, पाषाण, औंधकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना या प्रकल्पासाठी थांबावे लागेल यावरून स्पष्ट होते.

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या पुमटाच्या (पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण) बैठकीत दिल्या होत्या. मात्र, विद्यापीठ चौकातील जलवाहिनी हलविण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यास ‘पीएमआरडीए’ला परवानगी दिलेली नव्हती.

मध्यंतरी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा ‘पुमटा’ची बैठक झाली. पुलाच्या कामासाठी बॅरिकेडिंग केल्यानंतर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे परवानगी दिल्यानंतर पोलिसांकडून ते वारंवार काढण्यास सांगितले जाते. त्यामुळे चौकात पुलाचे काम सुरू करण्यात अडथळे येत असल्याचे ‘पीएमआरडीए’ने या बैठकीत निदर्शनास आणून दिले. या अडथळ्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितले होते. त्यावर सविस्तर चर्चा होऊन बैठकीत पोलिसांनी चौकात काम सुरू करण्यास परवानगी द्यावी.

पावसाळ्यापूर्वी चौकातील शक्य असेल, तेवढे काम गतीने कंपनीने मार्गी लावावे असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मान्यता दिल्यामुळे विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यालगत बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात केली. मात्र, मध्यंतरी वाहतूक कोंडी होते म्हणून पुन्हा पोलिसांनी बॅरिकेड काढले. त्यासाठी जी-२० परिषदेचे कारण पुढे केले. त्यानंतर अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंत दुमजली उड्डाणपुलाचे, तर नोव्हेंबर २०२४ पर्यंत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही, असे लेखी पत्र टाटा कंपनीने ‘पीएमआरडीए’ला दिले. तर ‘पीएमआरडीए’ने तसे पत्र ‘पुमटा’चे अध्यक्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे. या पत्राची प्रत ‘सकाळ’च्या हाती आली आहे. त्यावरून या प्रकल्पाच्या कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घटनाक्रम...
- १४ जुलै २०२० रोजी अस्तित्वातील उड्डाणपूल पाडला
- मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी टाटा कंपनीबरोबर २५ नोव्हेंबर २०२१ रोजी करार
- करारात ३६ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन
- उड्डाणपुलाचे काम वगळता मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरू
- २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘पुमटा’च्या बैठकीत उड्डाणपुलासाठी जानेवारी २०२३ची मुदत
- एक जानेवारी २३च्या ‘पुमटा’च्या बैठकीत जानेवारी २०२४ च्या मुदतीवर पुन्हा शिक्कामोर्तब
- २० मार्च २०२३ रोजी अद्यापही चौकात काम सुरू करण्यास परवानगी नाही

‘‘उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे असे आमचेही मत आहे. परंतु, प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक वळविल्यानंतर नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. शिमला चौकापासून औंध, बाणेरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा रोष ओढवून घेणे शक्य नव्हते. ‘पीएमआरडीए’कडून उड्डाणपुलाचे काम अपेक्षित गतीने होत नाही. या कामासंदर्भात वरिष्ठ पातळीवर एकत्रित बसून निर्णय घेणे गरजेचे आहे.’’
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे