पुणे (Pune) : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीचा बोगद्याच्या अहवालाची छाननी अंतिम टप्प्यात आली आहे.येत्या आठ दिवसांत हा अहवाल जलसंपदा विभागाकडून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे (स्टेट लेव्हल टेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी) पाठविण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाकडून या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे अडीच अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच पाणी गळती कमी होऊन शेतीला देखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी असा २८ किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी टेंडर काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी सध्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून त्यांची छाननी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत जलसंपदा विभागाकडून हा अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविला जाणार आहे. या समितीने प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्य शासनाची मान्यता घेऊन तातडीने कामाला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.
खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर असलेल्या कालव्याच्या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. सध्या ही जागा ५०० मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येतो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करावी, याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. तसेच यातून जलसंपदा विभागाला अतिरिक्त हस्तांतरण विकास हक्क (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स - टीडीआर) मिळेल किंवा कसे, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.