शेवगाव (Shevgaon) : शेवगाव शहराच्या पाणीटंचाईच्या समस्येवर वरदान ठरणारी नवीन पाणी योजना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पावित्र्यामुळे व नगरपरिषदेच्या नियोजनबद्ध उपायांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उशाशी असलेल्या जायकवाडी धरणाचा उद्भव असलेल्या ८९ कोटींच्या पाणी योजनेचे भांडवल सर्व बाजूंनी सुरू असले, तरी शहरवासीयांची हक्काच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात वणवण भटकंती सुरू आहे, तरीही मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या नियोजनामुळे आशादायी चित्र निर्माण झाले.
शहरासाठी असलेली जुनी पाणी योजना कालबाह्य झाली असून, शहराची वाढलेली लोकसंख्या, उपनगरांचे विस्तारीकरण यामुळे जुन्या योजनेवर ताण येऊन पाणीपुरवठ्यात प्रचंड अडचणी येत आहेत. जीर्ण जलवाहिन्यांमुळे त्यांची सातत्याने होणारी तुटफुट, विजेचे भारनियमन, व्हॉल्व्हची प्रचंड संख्या, एकाच घरात अधिकचे कनेक्शन संख्या अशा अनंत अडचणींवर मात करत योजना रडत कढत सुरू आहे.
आज शहराला १५ दिवसांनी पाणीपुरवठा सुरू आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रस्तावानुसार ७ एप्रिल २०१७ रोजी नगरोत्थान योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यातील तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मान्यता, टेंडर प्रक्रिया व कार्यारंभ आदेश अशा वेगवेगळ्या कारणांनी योजना २०१८ पासून रखडलेली आहे. ३५ किमीच्या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणानुसार नवीन वस्त्या, उपनगरे व गल्ल्यांसाठी ८५ किमीचा प्रस्ताव तयार केला आहे.
जलशुद्धीकरण केंद्राजवळील ११.८३ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभाच्या (टाकीचे) आरसीसी डिझाईनचे काम सुरू आहे. कोरडेवस्ती येथील ८.६० लाख लीटर क्षमतेच्या टाकीचे काम ४५ टक्के पूर्ण झाले. खंडोबामाळ येथील पाच लाख लिटरच्या तिसऱ्या टाकीचे व १.६० लाख लिटर चौथ्या टाकीचे काम डिझाईनस्तरावर आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे डिझाईन पूर्ण होऊन २० मेपर्यंत काम सुरू करण्याचा नगरपरिषद प्रशासनाचा मानस आहे.
जलशुद्धीकरण केंद्रापासून जलकुंभापर्यंतच्या ११.२१६ किमीच्या पाइपलाइनसाठी पाइपचा पुरवठा झालेला आहे. या योजनेच्या कामाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे विविध परवानग्यांसाठी प्रस्ताव दिले आहेत. जॅकवेल ते शुध्दीकरण केंद्र उर्ध्वगामी नलिका पाइपलइन १७ किमी असून, कामास सुरुवात झाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असलेली ही पाणी योजना निर्धारित वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करून शहरवासीयांना दररोज दरडोई १३५ लिटर पाणी पुरवण्याचे शिवधनुष्य प्रशासनास पेलावेल. पाणी योजनेसह नगरपरिषद हद्दीतील अनेक मूलभूत प्रश्नासंदर्भात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
याबाबत चर्चेसाठी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीस ही सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्याचा रोष प्रशासनावर येत असल्याने सर्व पक्षीय कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत तहसीलदार सांगडे यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांना कळवून याकडे लक्ष वेधले आहे.
नगरपरिषद हद्दीतील विविध प्रश्नांसंदर्भात आवश्यक ती सर्व माहिती व कार्यवाही आंदोलनकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पाणी योजनेसह नगरपरिषदेशी संबंधित असलेल्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, याबाबत प्रशासनास सहकार्य करावे.
- विजया घाडगे, मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद
गेल्या चार-पाच वर्षांपासून शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत प्रशासनाची उत्तरे ही ठरलेली आहेत. फक्त आंदोलनाच्या भीतीने कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून भासवले जाते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील नागरिकांच्या हाताशी काहीही लागत नाही. त्यामुळे सर्व पक्षीय कृती समिती आंदोलनावर ठाम आहे.
- अरुण मुंढे, भाजप प्रदेश चिटणीस