सोलापूर (Solapur) : बिहार, झारखंड आदी परराज्यातील कुशल कामगार दिवाळी उत्सव, छटपूजा आणि महापालिका व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी निवडणुकांमध्ये अडकल्याने समांतर जलवाहिनचे काम दीड महिने रखडले. त्यामुळे नाव्हेंबरऐवजी आता समांतर जलवाहिनीच्या पूर्णत्वासाठी जानेवारीचा मुहूर्त लागणार आहे.
सोलापूर शहरवासियांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न समांतर जलवाहिनीने बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे. २०१४ पासून प्रलंबित असलेले समांतर जलवाहिनीचे ८३८ कोटींचे प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहेत. जून २०२३ मध्ये या कामाला सुरवात केली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत कामाची मुदत होती. पाकणी, हिवरे आदी तीन ठिकाणी असलेले वन विभगााच्या जमिनीचा विषय वरिष्ठ स्तरावरून मार्गी लावले.
टेंभुर्णी येथील ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकण्याला विरोध केला. त्यामुळे गावाबाहेरून शेतकऱ्यांचे जमीन भूसंपादन करून जलवाहिनी टाकण्याची वेळ आली. त्यासाठी त्या जागेचा सर्व्हे, मोबदला आदी गोष्टी निश्चित झाल्या.
दरम्यान निवडणुका लागल्या आणि जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली. त्यामुळे टेंभुर्णी येथील १८०० मीटर अंतराचे भूसंपादन राहिले. त्याचबरोबर उजनी धरण परिसरातील जॅकवेलचे काम करणारे कुशल कामगार हे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आदी ठिकाणचे आहेत. दिवाळी त्यानंतर छटपूजा आणि निवडणुका यामुळे मजूरही लवकर परतले नाही. या कालावधीत छोट्या-मोठ्या जोडण्या आदी तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत.
समांतर जलवाहिनीचे काम पूर्णत्वासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आतापर्यंतची पूर्ण कामे
रेल्वे, नदी, राष्ट्रीय महामार्ग, कॅनॉल आदी ६३ प्रकारचे क्रॉसिंग जे तांत्रिकदृष्ट्याही अतिशय अवघड असलेली कामे पूर्ण
११० पैकी १०३ कि.मी अंतरावर जलवाहिनी टाकून पूर्ण झाले आहे.
७२ कि.मी . अंतराचे हायड्रोलिक चाचणी पूर्ण
उजनी धरण परिसरातील जॅकवेलचे काम ६० टक्के पूर्ण
दोन जलवाहिनींमधील ३६ जोडण्यांपैकी १६ जोडण्या पूर्ण
अपूर्ण कामे
टेंभुर्णी येथील १८०० मीटर अंतराचे भूसंपादन
पाकर्णी येथील जलशुध्दीकरण केंद्रासाठी जागा हस्तांतरण शासनाकडे प्रलंबित
जॅकवेलचे उर्वरित स्लॅबचे काम
२० ठिकाणी जलवाहिनी जोडणी काम
दिवाळी सणासाठी गेलेले मजूर लवकर परतले नाहीत आणि आचारसंहितमध्ये कर्मचारी अडकले होते. त्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम दरम्यानच्या काळात रखडले. काही दिवसांपूर्वी काम सुरू झाले आहे. अडचणीचे सर्व विषय बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. जलवाहिनीचे उर्वरित काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जिथे अडचणी आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर मार्गी लावण्यात येत आहेत.
- शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका