सोलापूर (Solapur) : पुढील आठवड्यात सोलापूरकरांना गोड बातमी मिळेल, असा दावा शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला. त्यामुळे गोरे यांच्या दाव्याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
होटगी रोड विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मी स्वतः पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना गोड बातमी समजेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर नियोजन भवन येथील बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूरच्या पाणी पुरवठ्याची समांतर जलवाहिनी सध्या अंतिम टप्प्यात आहे. समांतर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासोबतच पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या अडचणी संदर्भातही आपण लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले. पाकणी येथे वनविभागाच्या जागेवर जलशुद्धीकरण उभारण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला आहे.
वनविभाग या जागेवर काम करू देत नाही, हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना मुंबईत बोलविण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गोरे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिस व संबंधित यंत्रणांना सक्त सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील अनधिकृत वाळू तस्करी व वाळू उपसा यामध्ये आपण कोणाचीही हयगय करणार नसल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. वाळू चोरीमध्ये कोणीही व कितीही मोठा व्यक्ती असला तरीही त्याला सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील पाच वाळू तस्कारांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंटिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यातील तीन जणांना ताब्यातही घेतले असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांना दिली.
या पाच जणांमध्ये अक्कलकोट, पंढरपूर आणि मोहोळ या तालुक्यातील वाळू तस्करांचा समावेश आहे. उर्वरित दोघांना ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांची कार्यवाही सुरू आहे.