pune
pune Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Road Accident In Maharashtra : दुर्दैवी! 2023 मध्ये राज्यातील रस्त्यांवर का गेला साडेचौदा हजार जणांचा बळी?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बेदरकारपणे व सलग वाहन चालविणे, रस्त्यातच थांबलेली बेशिस्त वाहने आणि मागून धडक होऊन अपघात व मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये ३०० पेक्षा अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ११ महिन्यांत एकूण ३१ हजार अपघातात तब्बल १३ हजार ५७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. (Road Accident In Maharashtra)

हजारो कोटींचा खर्च करून रस्त्यांची कनेक्टिव्हीटी वाढली आणि दुसरीकडे अनेक वाहनांचा वेग बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त झाला आहे. चारचाकीस्वार सीटबेल्टचा तर दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांत उपाययोजना करण्यावर नुसतीच चर्चा होते. उपाययोजना केवळ कागदावरच राहतात, अशी वस्तुस्थिती आहे.

महामार्गांवर प्रवासी वाहतूक करणारी वाहने व अवजड वाहने बिनधास्तपणे थांबलेली असतात. अंधारात मागून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होऊन एकाचवेळी तीन ते पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिकाऊ परवाना आता ऑनलाइन झाल्याने बहुतेक तरुणांकडे किमान दुचाकी आहेत, असे चित्र आहे.

‘या’ जिल्ह्यात ३०० हून अधिक मृत्यूची नोंद

पुणे (१२७९), नाशिक (१००२), सोलापूर (७९८), नगर (७७९), नागपूर (६४४), मुंबई (५४१), सातारा (४५१), छत्रपती संभाजीनगर (४३५), जळगाव (४३२), बीड (४१५), यवतमाळ (३८५), कोल्हापूर (३७६), बुलडाणा (३७५), नांदेड (३४०), लातूर (३३९),अमरावती (३३१),सांगली (३१९), चंद्रपूर (३१५),धुळे (३०९), जालना (३०५)

मागील तीन वर्षांतील अपघात व मृत्यू -

२०२१ (जानेवारी ते नोव्हेंबर)

एकूण अपघात - २६,५३५

अपघाती मृत्यू - १२,१७०

गंभीर जखमी - २०,७३४

२०२२ (जानेवारी ते नोव्हेंबर)

एकूण अपघात - ३०,३९०

अपघाती मृत्यू - १३,८६८

गंभीर जखमी - २४,७४०

२०२३ (जानेवारी ते नोव्हेंबर)

एकूण अपघात - ३०,८५७

अपघाती मृत्यू - १३,५७९

गंभीर जखमी - २६,०५२

यावर्षी अपघाती मृत्यू वाढलेले जिल्हे

अकोला (२८), बुलडाणा (२२), परभणी (१९), लातूर (१५), हिंगोली (११), पुणे (२४), गडचिरोली (६), नंदुरबार (१८) व सोलापूर जिल्ह्यात आठ अपघाती मृत्यू अवघ्या ११ महिन्यात वाढले आहेत. १ ते २७ डिसेंबरपर्यंत देखील रस्ते अपघातात राज्यातील पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दंडाची रक्कम वाढलेली असताना, रस्ते चकाचक झालेले असतानाही अपघात व अपघाती मृत्यू वाढण्याची नेमकी कारणे काय आणि त्यावर ठोस उपाययोजना काय कराव्यात याचा गांभीर्याने विचार करणे काळाची गरज बनली आहे.