Chandrashekhar Bawankule Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर-सांगली महामार्गातील भूसंपादनाला चौपट मोबदला; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले.

या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा, तो मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात येईल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, महसूलचे अधिकारी आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करुन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक ‘१’ होता तो आता गुणांक ‘२’ करण्यात यावा. ज्यामुळे या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. शासनामार्फत यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने ही प्रक्रिया लांबली होती. आता या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात जोर धरत होती. याचा गांभीर्याने विचार करत खासदार धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मांडला होता. त्याबरोबरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यावर सविस्तर चर्चा केली होती. या अनुषंगाने बुधवारी (दि. ९ ) मुंबई मंत्रालय येथे बैठक बोलवण्यात आली होती.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरही कोणतीही अडचण न येता हा प्रश्न ३० मिनिटांच्या बैठकीत मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे उपस्थित आणि कोल्हपूर जिल्ह्यातील जनतेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.