अहिल्यानगर (Ahilyanagar) : वर्षाच्या अखेरीस महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांकडे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी ‘स्वागत कक्ष’ नसल्याचे कारण पुढे करत संपूर्ण दालन, मिटिंग हॉल आणि अँटी चेंबर चकाचक करण्यात येत आहे. सुमारे दहा ते बारा लाख रुपये खर्च करून हे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या वेटिंग हॉलमध्ये बसता येणार आहे, असा विश्वास महापालिकेच्या बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
महापालिकेची स्थापना २००३ मध्ये झाली. त्यानंतर अनेक वर्षे मध्यवर्ती शहरातील जुन्या महानगरपालिका इमारतीमधून शहराचा कारभार सुरू होता. त्यानंतर अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भव्य आणि प्रशस्त इमारतीमधून कारभार सुरू झाला. या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तळ मजल्यावर आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, अशी चार प्रशस्त दालने आहेत, तर पहिल्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, सभापती, महिला बालकल्याण सभापती, सभागृह नेता, या पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. आयुक्तांचे दालन प्रशस्त होते. त्यात अँटी चेंबर, लागूनच मिटिंग हॉल, तसेच स्वीय सहायकाला बसण्यासाठी स्वतंत्र जागा, अशी रचना आयुक्तांच्या सध्याच्या दालनाची होती. परंतु दालनातील ही जागा कमी पडत असल्याने, तसेच आलेल्या नागरिकांसाठी बसायला स्वागत कक्ष नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे आयुक्तांच्या दालनाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, प्रशस्त दालन असताना सुमारे दहा ते बारा लाख रुपये खर्च करून या दालनाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. नूतनीकरणानंतर नागरिकांना बसण्यासाठी स्वागत कक्ष उपलब्ध होणार आहे.
आयुक्तांचे दालन व मिटिंग हॉलच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. वार्षिक टेंडरमधून हे काम करण्यात येत आहे. आयुक्तांकडे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी स्वागत कक्ष नव्हता. त्यामुळे हे काम हाती घेण्यात आले आहे.
- मनोज पारखे, शहर अभियंता, महानगरपालिका
पदाधिकाऱ्यांचीही रंगरंगोटी
महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची प्रशस्त दालने आहेत. ही दालने तीच असली, तरी आतापर्यंत या सर्व दालनांमध्ये अनेक पदाधिकारी होऊन गेले. त्यात प्रत्येत वेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पदभार घेण्यापूर्वी दालनाची रंगरंगोटी केलेली आहे. काहींनी तर आपल्या दालनातील फर्निचर देखील बदलले आहे.
पुन्हा होणार खर्च
महापालिकेत प्रशासन राज येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांना महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या तीन महिन्यांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता देखील अनेकांनी बोलून दाखवलेली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांची दालने बंद अवस्थेत आहेत. निवडणूक झाल्यानंतर या दालनांना पुन्हा रंग चढणार आहे. रंगरंगोटी, नवीन फर्निचर यावर पुन्हा लाखोंचा खर्च होणार आहे.