water
water Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : उजनीपासून समांतर जलवाहिनीचे काम थांबवले, कारण...

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सुरू झालेले सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम तीनच दिवसात पुन्हा थांबवावे लागले आहे. उजनी धरणापासून ७५० मीटर अंतरावर जलवाहिनीच्या पंपगृहाचे काम सुरू असून त्यासाठी संबंधित ठेकेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय दोनवेळा ब्लास्टिंग (विस्फोटन) केले आहे. त्यामुळे उजनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी ते काम तत्काळ थांबवले आहे.

समांतर जलवाहिनीचे काम हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. २९ मेपासून कामाला सुरवात करण्यात आली आहे. सध्या उन्हाळा असल्याने उजनी धरण परिसरातील पंपगृहाचे (जॅकवेल) काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरण व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी उजनी धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ७५० मीटर अंतरावर पाण्याकडील बाजूला खोदाई करताना अनियंत्रित स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग केल्याची बाब समोर आली. २५ मे रोजी त्यासंदर्भातील सूचना देऊनही संबंधित मक्तेदाराने २६ व २७ मे रोजी दोनवेळा पुन्हा अनियंत्रित पद्धतीने ब्लास्टिंग केले आहे. त्यामुळे आता यापुढे धरण परिसरात ब्लास्टिंग करता येणार नाही.

ब्रेकरचा वापर करून त्याठिकाणचे काम पूर्ण करावे, असे पत्र उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी महापालिका आयुक्त शीलत तेली-उगले यांना धाडले आहे. अजूनही त्यासंदर्भातील लिखित ग्वाही महापालिकेकडून आलेली नसल्याने अद्याप काम बंदच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातील बाबी...

- उजनी धरणाच्या भिंतीपासून ७५० मीटरवर ब्लास्टिंग करता येणार नाही

- ठेकेदाराच्या प्रतिनिधीला सूचना करूनही त्यांच्याकडून २६ व २७ मे रोजी पुन्हा अनियंत्रित स्फोटकांचा केला वापर

- पंपगृहाचे काम करण्यासाठी ब्रेकरचा वापर करावा; स्फोटकांच्या वापरामुळे धरणाला होऊ शकतो धोका

- अनियंत्रित विस्फोटकांचा वापर झाल्यास धरणाच्या भिंतीला तडे जातील आणि मोठी गंभीर समस्या निर्माण शकते

- संबंधित मक्तेदाराकडून यापुढे धरण क्षेत्रातील खोदकामासाठी विस्फोटन (ब्लास्टिंग) करण्यात येऊ नये, त्यांना तत्काळ आदेश द्यावेत

- कोणताही परवानगी नसताना पुन्हा अनियंत्रित स्फोटकांचा वापर केल्यास मक्तेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल