Abhijit Bangar
Abhijit Bangar Tendernama
मुंबई

Thane : ठाण्यातील 600 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना आयुक्तांनी का दिली 15 डिसेंबरची डेडलाईन?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे शहरात सुरू असलेली सुमारे सहाशे कोटींची २८२ रस्त्यांची कामे येत्या १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, याची आठवण आयुक्तांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना करून दिली आहे.

ठाणे शहर खड्डेमुक्त व्हावे आणि ठाणेकरांना चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, या उद्देशातून ठाणे महापालिकेने शहरातील रस्त्यांची कामे हाती घेतली होती. या कामांसाठी राज्य सरकारने ६०५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला असून त्यातून २८२ रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. त्यात, विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे केली जात आहेत. ही कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत.

पावसाळ्यात, जुलै महिन्यापासून ही कामे थांबविण्यात आली होती. आता ती कामे पुन्हा सुरू झालेली आहेत. या रस्त्यांची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

जी कामे अपूर्ण आहेत, ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरू करायची आहेत, ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर असेल. सर्व अपूर्ण आणि नवीन कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. त्यात, प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामे शक्य नसतील तर त्याची संयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरू आहेत, असे होता कामा नये. कमीत कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आयुक्त बांगर म्हणाले.

कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील, त्यावर पर्याय शोधावा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढून घ्या. कोणत्याही स्थितीत १५ डिसेंबरनंतर ही कामे प्रलंबित राहू नयेत, असेही त्यांनी सांगितले. रस्त्यांची नवीन कामे सुरू करताना काही ठिकाणी वाहतूक वळवावी लागेल, अशा ठिकाणी नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल, याची दक्षता अभियंत्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.