मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) महापालिकेला गेल्या १५ वर्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून तब्बल १६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही ठाण्यातील समस्या अजूनही कायम असून ठाण्याचा विकास देखील रखडला आहे. त्यामुळे एवढा निधी खर्च झाला कसा झाला आणि कुठे झाला यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ठाणे काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले की, ठाणे महापालिकेला गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि भाजपच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून बीएसयुपी आणि स्मार्ट सिटी साठी ४ हजार कोटींचा निधी आला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून साडेसहा हजार कोटी तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी असा एकूण गेल्या १५ वर्षात १६ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला. कोट्यवधीचा निधी मिळाल्यावर ठाण्याचे शांघाय होणे आवश्यक होते. मात्र ठाणे शहरात घनकचरा, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकाम, शाळांची अवस्था, ड्रेनेज, धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. एवढा निधी आला असेल तर हा निधी गेला कुठे? असा प्रश्न विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे प्रत्येक विभागात झालेले काम तपासले गेले पाहिजे, टेंडर प्रक्रिया तपासणे गरजेचे आहे, कामे कायदेशीर झाली आहेत का, कामांना विलंब का झाला आहे का, कामाचा दर्जा तपासला गेला का यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेसच्या माध्यमातून विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. या कामाचे शासनाकडून सर्व जीआर मिळवले आहे. या सर्व कामांची पोलखोल करण्यासाठी लॉन्ग मार्च काढण्यात येणार आहे. कासारवडवली पासून बीकेसी येथील एमएमआरडीएच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.