Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

Thane : महापालिकेचे 'त्या' प्रकल्पासाठी रिटेंडर प्रसिद्ध; महत्त्वाची अटही शिथील

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिकेने भिवंडीतील आतकोलीच्या जागेवर कचरा प्रकल्प उभारणीसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. अनुभवाची अट पाच वर्षापर्यंत शिथील करुन हे टेंडर दुसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ३४ हेक्टर जमीन दिली आहे. याठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या तत्वावर ६०० ते ८०० मेट्रीक टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे १ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. डायघर भागात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी, तो पूर्णपणे अद्याप कार्यान्वित होऊ शकलेला नाही. यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची मोठी समस्या आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ठाणे महापालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडीतील आतकोली भागात ३४ हेक्टर इतकी जागा देऊ केली आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे.

याठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरण या तत्वावर ६०० ते ८०० टन मेट्रीक क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रकल्पात कचऱ्याचे तीन टप्प्यात वर्गीकरण केले जाणार आहे. जळाऊ साहित्य बाजूला करून ते सिमेंट कारखाना किंवा इतरत्र विकणे, खत निर्मिती करणे आणि घातक पदार्थ नसलेले साहित्य जमीन भरावासाठी वापरणे, असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी दहा वर्षांच्या संचलनाकरीता महापालिकेने टेंडर काढले होते. त्यात दहा वर्षांच्या अनुभवाची अट होती. परंतु या टेंडरला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेने ही अट शिथिल केली असून केवळ पाच वर्षे अनुभवाची अट नमूद करून नव्याने पुन्हा टेंडर काढले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस १५० कोटी रुपयांचा निधी उपबल्ध झाला आहे. त्यात, गायमुख येथे एकूण ९७ टन आणि नागला बंदर येथे ५० टन क्षमतेचा खत प्रकल्प तसेच, १.५ टन क्षमतेच्या खत निर्मितीच्या दोन मोबाईल व्हॅन यांचा समावेश आहे. यापैकी गायमुख प्रकल्पाकरिता उच्च दाबाची वीज जोडणी घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या कामासाठीही महापालिकेने टेंडर काढले आहे.