Rja Thackeray, Eknath shinde Tendernama
मुंबई

Raj Thackeray - Eknath Shinde : 'राज' भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या मोठा निर्णय; 'या' टोल नाक्यांवर आजपासून..!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहांसह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, आमदार प्रमोद पाटील, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे उपस्थित होते.
           
यावेळी शिष्टमंडळासमवेत आलेल्या मुलुंड, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे टोल वाढ आणि टोल नाक्यांवरील गर्दी, सोयीसुविधा याबाबत समस्या मांडल्या. यावेळी टोल बाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली.

कराराप्रमाणे टोल नाक्यांवर कंत्राटदाराने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामध्ये स्वच्छता गृहे, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, क्रेन याबाबी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता सतत राखली पाहिजे. मंत्री भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींना सोबत घेऊन आजपासून टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
           
टोल नाक्यांवर पिवळ्या पट्टीपर्यंत वाहनांची रांग लागणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घेतली पाहिजे. वाहनांच्या रांगा लागल्या, तर तसेच वाहने सोडून दिली पाहिजेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
           
मुंबई परिसरातील पाचही टोलनाक्यांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजण्यासाठी व्हीडीओग्राफी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील १५ दिवस हे चित्रीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले. टोल मार्गावरील जे उड्डाणपूल, पूल, भुयारी मार्ग आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई हद्दीतील मुलुंड येथील हरिओमनगर वसाहतीतील रहिवाशांना टोल नाक्यावरून जावे लागू नये यासाठी नवघर पोलिस ठाण्याजवळील नाल्यावर तातडीने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी पोलिसांच्या घरांच्या विषयावरही चर्चा झाली. पोलिसांना निवास देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्यासाठी पुढाकारही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सिडकोला पाच हजार घरांचे उद्धिष्ट देण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांना हक्काची घरे कशी मिळतील यासाठी खासगी विकसकांना आणि एसआरए प्रकल्पांमध्ये वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देऊन अधिकची घरे मिळू शकतील का, यासाठी अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अर्चना त्यागी आदी उपस्थित होते.