Local Train Tendernama
मुंबई

Mumbai : मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसाट; नव्या लोकल, नवीन टर्मिनल्स...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईसाठी लवकरच ३०० नव्या लोकल रेल्वे मिळणार आहेत. तसेच जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत 3 मोठ्या योजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणार आहे. रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्स उभारण्यात येणार आहे. मुंबई लोकल रेल्वेंमध्ये अतिरिक्त 300 रेल्वेंची भर पडणार आहे.

या योजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासोबतच एमएमआर परिसरात कनेक्टिव्हिटी, व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकारकडून लवकरच सर्व लोकल रेल्वेचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळे प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळे रेल्वेच्या नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण येईल. एसी लोकलमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळे व दरवाजात उभे राहिल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळे हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतो. मुंबई लोकलमधून दररोज ७५ लाख नागरिक प्रवास करतात.