Mumbai Vadodara Expressway Tendernama
मुंबई

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग मिशन मोडवर

Mumbai Vadodara Expressway: पालघरमधील कामांना एप्रिल २०२६ची डेडलाईन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग (Mumbai Vadodara Expressway) पश्चिम भारताच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे.

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या या महामार्गाचे काम पालघर जिल्ह्यात सध्या वेगाने सुरू असून एप्रिल २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे.

मुंबई ते वडोदरा दरम्यान एकूण ३८० किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गापैकी पालघर जिल्ह्यात १२० किलोमीटर लांबीचा भाग समाविष्ट आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण १२८ किलोमीटर लांबीपैकी अंदाजे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तलासरी ते डहाणू या टप्प्यात भराव (माती-मुरुम) आणि काँक्रीटीकरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. तर उर्वरित दोन टप्प्यांची प्रगती ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील तिन्ही टप्प्यांचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या सोनावे आणि दहिवाले गावांदरम्यान वैतरणा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या हद्दीतील बहुतांश नद्यांवरील पुलांची बांधकामे पूर्ण झाली आहेत.

महामार्गाचे काम सुरू असताना अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागला. भूसंपादन प्रक्रिया, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांनी दाखल केलेले न्यायालयीन दावे यामुळे महामार्ग निर्मितीत आव्हाने उभी राहिली. महामार्गाच्या आरेखनात संरक्षित वनक्षेत्र आणि खाडी क्षेत्रातील कांदळवनामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले.

२०२०-२१ दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे कामाला उशिरा सुरुवात झाली आणि त्यानंतर मान्सून कालावधीत जुलै-सप्टेंबर दरम्यानच्या जोरदार पावसामुळे कामाची गती मंदावली होती. २०२१ च्या अखेरीस पालघर जिल्ह्यातील कामाला सुरुवात झाली आणि आता तांत्रिक अडथळे दूर करून काम प्रगतीपथावर आहे.

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यावर केवळ प्रवासाच्या वेळेत बचत होणार नाही, तर जिल्ह्याच्या आणि क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. मुंबई-वडोदरा दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होईल, ज्यामुळे वाहतूक आणि दळणवळण सुलभ होईल.

उरण येथील जेएनपीटी बंदर, कोकण, गोवा आणि पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने या महामार्गाचा वापर करतील. यामुळे विद्यमान मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मदत होऊन, येथील औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन आणि कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होईल.

जलद कनेक्टिव्हिटीमुळे या क्षेत्रात व्यवसाय आणि गुंतवणुकीला गती मिळेल, परिणामी रोजगाराच्या संधी वाढतील. पालघर जिल्ह्यासाठी हा द्रुतगती महामार्ग केवळ पायाभूत सुविधांचा एक भाग नसून, तो जिल्ह्याच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.