मुंबई (Mumbai): कल्याण-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर शहाड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरणाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. एमएमआरडीएद्वारे या कामासाठी ३२० कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल चार पदरी होणार आहे.
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल शहरांतर्गत वाहतुकीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी ३० मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३६ मीटर आहे. या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते.
कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची स्थानिकांकडून मागणी करण्यात येत होती.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची मागणी केली होती. त्यासाठी निधीही मंजूर झाला. तसेच एमएमआरडीएने या कामासाठी ३२० कोटी रुपयांची टेंडर जाहीर केली. वाहनांची गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपूल २+२ असा चार पदरी विकसित करणे गरजेचे होते.
याच पार्श्वभूमीवर या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या रेल्वेउड्डाणपुलाची एकूण लांबी १०९० मीटर इतकी आहे. या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर शहाड पुलावरची कोंडी लवकरच फुटणार आहे.
उन्नत मार्गाला गती; ३६ कोटींचे टेंडर
ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यानच्या ३६० मी लांबी आणि ७.५ मी रुंदीचा उन्नत मार्ग आणि १५ मीटर रुंदीच्या जोडरस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षे हा मार्ग म्हसोबा झोपडपट्टीमुळे आणि निधी अभावी रखडला होता. मात्र परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवरील ताण वाढत असून वाहतुकीची कोंडी, त्यामुळे प्रवासातील विलंब, होत होता. गतिमान प्रवास आणि अपघाताचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
डोंबिवली पश्चिम, ठाकुर्ली आणि डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. स्थानिक भागातील वाहतूक जलदगतीने होण्यास हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. ३६ कोटी रुपये खर्चाच्या या कामाची देखील टेंडर प्रक्रिया सुरु असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे.