MMRDA
MMRDA Tendernama
मुंबई

'एमएमआरडीए'चा महत्त्वाकांक्षी प्लॅन; विरार ते पालघर तब्बल 59 किमीचा सागरी मार्ग

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच मुंबईतून वसई, विरारपर्यंत सहजपणे पोहोचता यावे म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने उत्तन-विरार सागरी सेतू उभारण्याचे प्रस्तावित केलेले असतानाच आता दुसऱ्या टप्प्यात हा मार्ग पालघरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तन-विरार सागरी सेतूला जोडून पुढे तब्बल ५९ किलोमीटर लांबीचा विरार ते पालघरपर्यंत सागरी मार्ग उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याबरोबरच लवकरच याचा प्राथमिक आराखडा तयार केला जाणार आहे.

राज्य सरकारने वर्सोवा-उत्तन (भाईंदर) या मुंबई महानगरपालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या सागरी मार्गाला जोडून पुढे टप्पा-१ अंतर्गत विरारपर्यंत सागरी सेतू उभारण्यास एमएमआरडीएला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर टप्पा-२ अंतर्गत विरार-पालघर या दरम्यान सागरी मार्ग उभारण्यास तत्वतः मंजुरी दिली असून त्यानुसार प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे आणि आराखडा तयार करण्यास परवानगी दिली आहे. तसेच याचा खर्च एमएमआरडीएने स्वनिधीतून करावा असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेने मरीन लाईन्स ते वरळी सागरी किनारा मार्ग उभारला असून त्याची एक मार्गिका सुरू झाली आहे. तर एमएसआरडीसीने उभारलेल्या वरळी-वांद्रे सी लिंकवरून वाहतूक सूरु आहे. तसेच वांद्रे-वर्सोवा या सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाची उभारणी एमएसआरडीसीकडून सुरू असून वर्सोवा ते उत्तन हा मार्ग मुंबई महानगरपालिका बांधणार आहे. त्यापुढे उत्तन-विरार आणि विरार-पालघर हा सागरी मार्ग एमएमआरडीए उभारणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई आणि पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रवासाला वेग येणार असल्याचे दिसते.