Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis: 2029 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होणार

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांची माहिती; गुंतवणूक, उद्योग, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रावर भर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून, पुढील काही वर्षांत राज्य देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधानसभेत २०२६–२७ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. आर्थिक शिस्त राखत मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाढवली असून २०२९–३० पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पावरील चर्चेत सुमारे ८४ सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक स्थिती, कर्ज, सिंचन, वीज, उद्योग, पायाभूत सुविधा, जलजीवन मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१३–१४ मध्ये राज्याचे सकल राज्य उत्पादन (GSDP) सुमारे १६ लाख कोटी रुपये होते, ते गेल्या दशकात वाढून ५१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. राज्याचा विकासदर स्थिर किमतीवर ७.९ टक्के, तर चालू किमतीवर १०.४ टक्के आहे.

दरडोई उत्पन्नही ३,१७,८०० रुपयांवरून ३,४७,९०३ रुपयांपर्यंत वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या लोकसंख्येत महाराष्ट्राचा वाटा ९.५ टक्के असला तरी देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १४.३ टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परकीय गुंतवणूक, तेलाव्यतिरिक्त निर्यात, स्टार्टअप्स, युनिकॉर्न, बँक ठेवी, बँक कर्ज वितरण आणि जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्याच्या कर्जाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, डेट-टू-जीडीपी गुणोत्तर सुमारे १८.२ टक्के आहे, जे केंद्राने ठरवलेल्या २५ टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे इतर अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची वित्तीय स्थिती अधिक मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा आणि विकासासाठी भांडवली खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे. २०१३–१४ मध्ये २५ हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च होता, तो आता वाढून सुमारे २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

राज्याची अर्थव्यवस्था सध्या सुमारे ६६० अब्ज डॉलर इतकी असून गेल्या वर्षातच ५५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. हीच गती कायम राहिल्यास २०२९–३० पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.