Ring Road
Ring Road Tendernama
मुंबई

Good News : 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 4 मिनिटांत; कल्याणच्या 'त्या' उन्नत मार्गासाठी 700 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण शहरातील जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून आवश्यक ७० टक्के जमीनही संपादित करण्यात आली आहे. अडीच किलोमीटरच्या या उन्नत मार्गासाठी ७०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे टेंडर प्रसिद्ध होणार आहे.

कल्याण हे तालुक्याचे शहर असून अनेक शहरांना जोडणारे केंद्र आहे. अनेक महामार्ग या कल्याण शहराच्या शेजारून गेले आहेत. सध्याच्या घडीला कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील प्रवासी, वाहन चालक भिवंडी, ठाणे आणि मुंबईत जाण्यासाठी कल्याण शहरातून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण शहराचे प्रवेशद्वार कोंडीत अडकते. यावर उपाय म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले. त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून त्यासाठी आवश्यक ७० टक्के जागाही संपादित करण्यात आली आहे.

आराखड्यानुसार विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या शेजारून हा उन्नत मार्ग सुरू होतो. कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण-बदलापूर राज्य मार्ग आणि पुढे कल्याण-कसारा रेल्वे मार्ग ओलांडून वालधुनी नदीला समांतर असा हा उन्नत मार्ग थेट अहमदनगर महामार्गाला जोडला जाणार आहे. विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीजवळून हा मार्ग सुरू होऊन कल्याण-अहमदनगर महामार्गावर पाल्म वॉटर रिसॉर्ट येथे उतरणार आहे. जवळपास अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी ७०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर भौगोलिकदृष्ट्या दूर नाही. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विठ्ठलवाडी भागातून थेट कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील कोंडी सुटून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच त्यामुळे सुमारे पाऊणतासाचा प्रवास फक्त पाच मिनिटांत होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण क्रीडा अशा विविध सुविधांची उभारणी वेगाने झाल्याने येथे लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येला रस्ते, उड्डाणपूल आणि कोंडीमुक्त वाहतूक देण्याचा प्रयत्न कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहेत. त्याअंतर्गत गेल्या काही वर्षांत मेट्रो १२, ऐरोली-काटई उन्नत मार्ग, माणकोली मोठा गाव उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, शिळफाटा उड्डाणपूल, शिळफाटा रस्ता असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत.