Shaktipeeth Mahamarg Tendernama
मुंबई

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्ग बाधितांची 20 फेब्रुवारीला राज्यव्यापी बैठक

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पर्यायी महामार्गाचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न महायुती सरकार करीत असल्याची टीका करुन याविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी बाधित शेतकऱ्यांनी सुरु केली.

महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करायच्या कामांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक येत्या 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे होणार आहे अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली.

महायुती सरकार गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत. पण कोणतेही अधिकृत सर्क्युलर, नोटिफिकेशन सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग करण्यासाठी ते खोट्या प्रचाराचा देखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की, या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे. खरे तर या विरोधात 12 पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या फेब्रुवारी 2024 पासून आंदोलन करत आहेत. याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी 24 जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन 10 जिल्ह्यांमध्ये केले. मुख्यमंत्र्यांना गृहखाते या सर्वांची माहिती देतात. तरीदेखील पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विपर्यास करत नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा स्टेटमेंट दिले की शक्तीपीठ महामार्गाला सर्व आमदारांनी समर्थन दिले आहे, ही गोष्ट देखील खरी नाही.

शक्तीपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे, पर्यावरणाचे, करदात्यांचे, जनतेचे सर्वांचेच नुकसान होणार आहे. पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्यातील एकजूट घडवत आरपारची लढाई करायचे ठरवले आहे. यासाठी राजर्षि शाहू महाराजांच्या भूमिमध्ये राज्यव्यापी बैठक घेऊन तेथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही बैठक गुरुवारी, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00  वाजता कोल्हापुरातील राजर्षि शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे. या बैठकीस कोल्हापूर सह बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले आहे.