Potholes
Potholes Tendernama
मुंबई

खड्ड्यांनी कंबरडे मोडले अन् दुरुस्तीचे १५ कोटींचे टेंडर प्रक्रियेत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan-Dombivali Municipal Corporation) हद्दीतील पावसाळ्यापूर्वीचे आणि त्यानंतर पडणारे खड्डे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने १५ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, पाऊस मध्यावर आला तरी शहर अभियंता विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याच्या कामाची टेंडर प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरातील एकही खड्डा बुजविण्यात आला नाही. हेच खड्डे मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आता मोठ्या आकाराचे झाले आहेत. प्रवाशांना मनस्ताप देत हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन आता १५ कोटींचा चुराडा करणार आहे, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे.

तसेच, महापालिकेतील शहर अभियंता, बांधकाम विभाग, ठराविक ठेकेदार यांची वर्षानुवर्षाची अभद्र युती शहरांमधील खड्ड्यांना जबाबदार आहे. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांना खड्ड्यांसारखी कामे मार्गी लावणे जमले नाही. ती कामे मार्गी लावण्यासाठी स्वत: लक्ष घालून या कामांवर देखरेख करण्यासाठी विश्वासू अभियंत्यांची नेमणूक करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

खड्डे भरण्याची कामे ठेकेदाराला दिली की त्यांचे कामगार मनमानी पद्धतीने खड्डे भरतात. या खड्डयांची शास्त्रोक्त पध्दतीने भरणी केली जात नाही. या कामावर देखरेख करण्यासाठी ठेकेदार, महापालिकेचा पर्यवेक्षक अभियंता स्पॉटवर नसतो. त्यामुळे शास्त्रोक्त पध्दतीने न भरलेले खड्डे दोन दिवसात पुन्हा जैसे थे स्थितीत असतात. महिनाभरापासून शहराच्या विविध भागात खड्डे पडले आहेत. या कामांकडे बारकाईने कोणा अधिकाऱ्याचे लक्ष नाही. करदाता सामान्य नागरिक, नोकरदार मात्र वेळेवर कर भरणा करून वाहतूक कोंडी, खड्ड्यांचा मनस्ताप सहन करत प्रवास करत आहे" अशी टीका देखील आमदार पाटील यांनी केली आहे.

खड्डे भरणीच्या कामाच्या टेंडर प्रक्रिया, ठेकेदारांना कामाचे आदेश मार्च, एप्रिलमध्ये देऊन मे महिन्यात पावसाळ्या पूर्वीची खड्डे भरणीची कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. यावेळी प्रथमच जुलै मध्यावर आला तरी शहर अभियंता विभाग पावसाळापूर्वीची आणि त्यानंतरची खड्डे भरण्यासाठी टेंडर प्रक्रियाच पूर्ण करत होते. अशाप्रकारच्या वेळकाढूपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. तर, माजी आयुक्तांचे आजार, शहर अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सलगच्या सु्ट्टया यामुळे ही कामे रखडली असल्याचे महापालिका अभियंते सांगतात. महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र दहा प्रभागांच्या हद्दीत १० ठेकेदार नेमून खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत. आता खडी टाकून खड्डे भरले जात आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर सिमेंट मिश्रणाचा गिलावा खड्ड्यांमध्ये भरण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले.