मुंबई (Mumbai) : मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडी पुनर्विकास प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २६५ रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रहिवाशांना हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडी येथील पुनर्विकास प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला होता. सुमारे २५ वर्षांच्या कालावधीत तब्बल ३६ विकासकांनी हा प्रकल्प हाती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विविध कारणांमुळे काम पुढे सरकू शकले नव्हते. अखेरीस ३७वे विकासक म्हणून श्रीपती डेव्हलपर्स आणि आमदार पराग शहा यांनी पुढाकार घेत हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. अवघ्या दोन वर्षांत इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्याने येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कार्यक्रमाला आमदार पराग शहा, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, श्रीपती डेव्हलपर्सचे सतीश चतुर्वेदी, जुनी चिखलवाडी रहिवासी संघाच्या अध्यक्ष सुरेखा परब आणि सरचिटणीस चिंतामण दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आज चिखलवाडीतील रहिवाशांचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. शासनाने मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेतील प्रोत्साहनामुळेच पूर्वी १२० चौ.फुटांच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना आता सुमारे ५८५ चौ.फुटांचे प्रशस्त २ बीएचके घर मिळाले आहे.
या प्रकल्पात रहिवाशांना विक्रीयोग्य घरांच्या दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या असून इमारतीमध्ये जिम, वाचनालय, लग्नसमारंभासाठी हॉल आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील सेस आणि नॉन-सेस इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
याशिवाय घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील १७ हजार घरांच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हाडा, एसआरए, बीएमसी, एमएमआरडीए आणि इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विकासकांकडे रहिवाशांना घरासोबत एखादी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार विकासक सतीश चतुर्वेदी यांनी प्रत्येक कुटुंबाला घरासोबत २४ इंची रंगीत दूरदर्शन संच भेट देण्याची घोषणा केली.