Local Train
Local Train Tendernama
मुंबई

BUDGET 2023 : मुंबई लोकल रेल्वेच्या MUTP प्रकल्पांना निधीची गरज

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईमध्ये मध्य, हार्बर आणि पश्चिम या मार्गावर रेल्वे चालवली जाते. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा कर्जत खोपोली या मार्गावर, हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल गोरेगाव या मार्गावर तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार डहाणूपर्यंत रेल्वे चालवली जाते. लोकलवरील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एमयुटीपी प्रकल्प २ आणि ३ सुरु करण्यात आले आहेत. निधीअभावी हे प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत. केंद्र सरकारकडून यंदाच्या बजेटमध्ये एमयुटीपी प्रकल्पांसाठी निधी मिळावा, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे कामा धंद्यानिमित्त देशभरातून लोक मुंबईत येतात. परिणामी मुंबईमधील लोकसंख्या सतत वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास परवडत असल्याने दररोज ७० लाखाहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकांना ट्रेनच्या दरवाजात लटकत प्रवास करावा लागतो. यामुळे दरवर्षाला अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात.

ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांना प्रवासामध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी एमयुटीपी प्रकल्प २ आणि ३ सुरु करण्यात आले आहेत. मात्र यासाठी गेल्या दोन ते अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य प्रमाणात निधी देण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षात निधी योग्य प्रमाणात दिला जात नसल्याने हे प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत अशी माहिती रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला ५ वी, ६ वी लाईन ६५९ कोटी खर्च. ठाणे ते दिवा पेअर लाईन १३३ कोटी. बोरिवली ते मुंबई सेंट्रल ६ वी लाईन ५२२ कोटी खर्च. गोरेगाव पर्यंत हार्बर लाईनची सेवा वाढवणे १०३ कोटी खर्च. १९१ ट्रेन एसी. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांसाठी कल्याण येथे सुविधा निर्माण करणे. कल्याण ते आसनगाव दरम्यान ४ थी रेल्वे लाईन. कल्याण आणि बदलापूर दरम्यान ३ री आणि ४ थी लाईन असे प्रकल्प आहेत.

या एमयुटीपी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून यंदाच्या बजेटमध्ये निधी मिळावा. तसेच प्रवाशांना सुविधा देताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आरपीएफ जवानांची विशेष करून महिला जवानांची भरती करणे गरजचे आहे. रेल्वेमधील अपघात रोखण्यासाठी योजना आखण्याची गरज असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.