Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

Mumbai : मेट्रोप्रमाणे नवी मुंबई मेट्रोचे तिकीट का नाही? स्थानिकांची मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धाव

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना तब्बल दुप्पटीचे तिकीटभाडे देऊन मेट्रोचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोप्रमाणे नवी मुंबईकरांना किमान समान तिकीट भाडे आकारावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. यासाठी स्थानिकांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घातले आहे.

मुंबईत पहिल्या तीन किलोमीटरसाठी १० रुपये आणि तीन ते १२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागतात. तर नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये आणि १ ते १० किलोमीटरचा प्रवास केल्यास ४० रुपये मोजावे लागतात. 'महामेट्रो'कडे मुंबई व नवी मुंबई मेट्रोचा कारभार चालविण्याचे काम आहे. तळोजा वसाहतीमधील रहिवाशांना नवी मुंबई मेट्रो सेवेचा सर्वाधिक लाभ होत आहे. वाहतूक कोंडीत न अडकता अवघ्या काही मिनिटांत प्रवाशांना वातानुकूलित डब्यांमधून थेट तळोजा ते बेलापूर असा प्रवास करता येतो. मात्र या प्रवासाचे तिकीटदर कमी केल्यास अजूनही प्रवासी संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. सिडकोला तळोजा ते बेलापूर या पहिल्या टप्यातील मेट्रोमधून दिवसाला ९८ हजार प्रवासी लाभ घेतील असे अपेक्षित होते. यासाठी सिडको मंडळाने २९५४ कोटी १४ लाख रुपये खर्च करुन ही मेट्रो सेवा सूरु केली. आतापर्यंत १० दिवसात प्रतिदिन २० हजार प्रवासीसंख्या नोंदविली गेली. सिडको ० ते १० किलोमीटरसाठी ४० रुपयांऐवजी २० रुपये भाडे आकारल्यास सिडकोच्या परिवहन विभागाने मांडलेले प्रवाशांचे गणित जुळेल असे बोलले जाते.

मेट्रोचे दर मुंबईप्रमाणे आकारावे अशी व्यापक मागणी आहे. त्यासाठी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली जात आहे. अजूनही अधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठका सुरु आहेत. मात्र कोणतेही ठोस उत्तर न आल्याने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत लेखी मागणी केली आहे. यामुळे मेट्रोचे प्रवासी वाढतील आणि सर्वांचा प्रवास सुखकर होईल. गरीबांसाठी सिडकोने या परिसरात ५० हजारांहून अधिक घरे बांधलीत. या गरीब प्रवाशांना गारेगार मेट्रोचा प्रवास करण्याची संधी मिळणे त्यांचा हक्क आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी दिली.