Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

Eknath Shinde : जागतिक आर्थिक परिषदेत पाच लाख कोटींचे MOU

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षांकित झाले. त्याचप्रमाणे, सुमारे एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईत सांगितले.

जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर,  दक्षिण कोरीया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएई, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर आर्सेलर मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75 ते 80 टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे 2 लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहे. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खाण उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर,  इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्हिजन, डॉयनॅमिक लिडरशीप, ग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली  असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.