Ashwini Bhide
Ashwini Bhide Tendernama
मुंबई

Mumbai Metro-3 : कोर्ट-कचेरीमुळे भुयारी मेट्रोच्या खर्चात तब्बल 5 हजार कोटींची वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो मार्ग-३ चे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून हा मार्ग नवीन वर्षात सुरू होणार आहे. मेट्रो कारशेडचे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे प्रकल्पाचा खर्च सुमारे पाच हजार कोटींनी वाढल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्यकारी संचालिका अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित ज्येष्ठ पत्रकार आप्पा पेंडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते. येत्या जानेवारी अखेरपर्यंत डेपो कनेक्टीव्हिटीचे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर दोन ते तीन महिन्यात मेट्रो 3 चा पहिला टप्पा सुरू होईल, अशी माहिती भिडे यांनी दिली. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो नवीन वर्षातच धावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रो ३ मार्गिकेची जबाबदारी ‘एमएमआरसी’वर आहे. भिडे म्हणाल्या, मुंबईतील पूर्णत: भुयारी असलेली मेट्रो ३ मार्गिका पूर्णत्वास नेणे हे आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान होते. ती सर्व आव्हाने पेलत आता हे काम पूर्णत्वास आले आहे. मुंबईत खासगी वाहनांची संख्या १४ लाख असून तिन्ही बाजूला समुद्र विस्तारलेला असल्याने अनेक अडचणी आहेत. रेल्वे आणि बसवर क्षमतेपेक्षा अधिक ताण पडत आहे. मेट्रोमुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. मेट्रो ३ ची ३३.५ किलोमीटरची मार्गिका आहे. सुमारे ३७ हजार २७६ कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्र राज्य सरकारकडून अनुदान मिळाले असून जायका या कंपनीकडून ५७ टक्के कर्ज उभारणी केल्याचेही भिडे यांनी सांगितले. आठ डब्ब्यांची ही गाडी असून २४०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे तसेच सर्व प्रकारची कामे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केल्याचेही त्यांनी सांगितले.

भुयारी मार्गात एकूण २६ स्टेशन्स असून, १९ स्टेशन्स रस्त्यावर खड्डा खोदून बांधण्यात आली आहेत. विशेष म्हणजे  वाहतूक व्यवस्था सुरू ठेवून कामे करण्यात आली. यासाठी सुमारे १२ किमीचे रस्ते खोदण्यात आले. त्यातील अडीच किमीचे रस्ते व्यवस्थित करण्यात आले असून ९.५ किमी रस्ते शिल्लक आहेत. येत्या जुलैपर्यंत हे सर्व रस्ते पूर्ववत होतील असेही त्यांनी सांगितले. मेट्रो ३ चा प्रकल्प साकारताना सुमारे ७५ हेक्टर जमीन संपादन केली. त्यातील ७३ हेक्टर जागा शासकीय होती तर अडीच हेक्टर खासगी होती. अनेक ठिकाणी झोपडपट्टया होत्या. त्यातील रहिवाशांचे पुर्नवसन करण्यात आले. मेट्रो प्रकल्पात २८०० झाडे स्टेशनसाठी तर २१४१ झाडे डेपोसाठी काढण्यात आली, मात्र तेवढीच झाडे वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो कारशेडचा प्रकल्प कोर्टात अडकल्याने झालेल्या विलंबामुळे खर्चात ४ ते ५ हजार कोटींनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळयात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते, त्यामुळे भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू शकेल का यावर बोलताना त्या म्हणाल्या की, पावसाचा कोणताही परिणाम होणार नाही अशा पध्दतीने बांधणी करण्यात आली आहे. या सगळ्याच्या अगोदर अभ्यास करण्यात आला. गेल्या दोन अडीच वर्षांपासून काम सुरू आहे, पण पावसाळ्यात कुठेही पाणी साचले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी आत जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईत अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मेट्रोमुळेच वाहतूक कोंडी होते असे म्हणता येणार नाही. वाहतूक सुरू ठेऊन मेट्रोची कामे सुरू आहेत. मुंबईत वाहनांची संख्या १२५ टक्के वाढल्याचेही भिडे यांनी सांगितले. भू संपादनापासून ते प्रकल्प उभारणीपर्यंतची सर्व माहिती, त्यातील अडचणी, त्यातून काढलेला मार्ग या सगळ्यांची माहिती भिडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.