Gadkari
Gadkari Tendernama
मराठवाडा

गडकरीजी, 'या' 4 हजार कोटींच्या रस्त्याबद्दलही माफी मागणार का?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : मध्य प्रदेशातील एका रस्त्याचे काम खराब झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या जबलपूर - मंडला या ६३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामावर आपण खूश नसल्याचे सांगत गडकरी यांनी आपला माफिनामा सादर केला. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र - मराठवाडा आणि खांदेशला जोडणाऱ्या सोलापूर - धुळे या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जामुळे उखडलेल्या महामार्गाबाबत गडकरी काय प्रतिक्रिया देणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मध्य प्रदेशातील मंडलामधील १,२६१ कोटींच्या एकूण ३२९ किमी लांब ५ राष्ट्रीय राजमार्गांच्या कामाचा शिलान्यास करण्यासाठी गेले होते. दरम्यान जबलपूर – मंडला या ४०० कोटी खर्चून ६३ किमी लांबीच्या दोन पदरी रस्त्याचे खराब काम झाल्याची तक्रार जनतेच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी गडकरी यांच्याकडे केली होती. दरम्यान गडकरींनी मी रस्त्याच्या कामावर खूश नाही, असे म्हणत जनतेची जाहीर माफी मागितली. यानंतर त्यांनी सदर हायवेचे उर्वरीत काम तातडीने थांबवा, खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, नवीन टेंडर काढून चांगला रस्ता करा, असे आदेश अधिकाऱ्यांना देत वेळ मारून नेली.

महाराष्ट्रातील या रस्त्याचे काय?

सोलापूर - धुळे महामार्गावरील तीन हजार कोटींचा सोलापूर - एडशी - औरंगाबाद - करोडी - तेलवाडी हा नवाकोरा महामार्ग दोष निवारण कालावधी आधीच उखडला. पुढे कन्नड घाटात रुंदीकरण की भुयारी मार्ग यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यात चाळीसगाव ते धुळे या एक हजार कोटींच्या रस्ते कामात ठेकेदाराचा प्रचंड हलगर्जीपणा दिसून येत आहे. या नव्याकोऱ्या मार्गात जागोजागी भगदाड पडल्याने महामार्गाची दुरवस्था बघायला मिळत आहे. यावरून या महामार्गातील बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे. आता स्वतःच्या राज्यातील उखडलेल्या या महामार्गाबाबत गडकरी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर - धुळे हा महामार्ग खांदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे.  खांदेशमधील धुळे, जळगाव; मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि पश्चिम महाराष्ट्रातील धाराशीव, सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. राज्यातील सात जिल्ह्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग अवघ्या वर्षभरात उखडला आहे. या रस्त्यासंदर्भात टेंडरनामाने एस. टी. बस चालकांना विचारले असता सोलापूर येथून तेलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबर उखडले असून, अपघातांना निमंत्रण मिळते आहे. उद्घाटनानंतर वर्षभरातच महामार्गाची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे.

आयआरबी या कंत्राटदार कंपनीने ऐडशी ते औरंगाबाद १९०.२ किमीसाठी १८७१.३४ कोटींतून, तर एल अॅंड टी या कंत्राटदार कंपनीने निपानी ते करोडी ३०.२१५ किमीसाठी ५१२.९९ कोटीतून तर दिलीप बिल्डकॉन या कंत्राटदार कंपनीने करोडी ते तेलवाडी पर्यंत ५५.६१० किमीसाठी ५१२.०२ बांधलेला महामार्ग वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अनेक ठिकाणी हा महामार्ग उखडला आहे. संबंधित कंत्राटदारांना बांधकामाचे पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ऐडशी औरंगाबाद टोलवेज लिमिटेडने (आयआरबी) बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या हद्दीत ऐडशी येथे महामार्गावर टोलनाका उभारला. दुसरा टोलनाका करोडी आणि तिसरा टोलनाका हतनूर येथे उभारला. टोलचे दर देखील निश्चित करण्यात आल्यानंतर जवळपास मागील वर्षभरात पाचशे कोटींची वसुली केली. मात्र उखडलेल्या महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अधिकारी आणि कंत्राटदार कानाडोळा करत आहेत.

औट्रम घाटाचे काय? 

याच महामार्गावरील औट्रम घाटातील बोगद्याचे काम मागील अकरा वर्षांपासून रखडल्याने घाटातील वाहतूक रामभरोसेच असून, वाहतूक दररोज पाच ते सहा तास ठप्प होत आहे. अडीच हजार कोटीचा बोगदा सहा हजार कोटींवर गेल्याने आता बोगद्याचे काम रद्द करून आहे त्याच रस्त्याचे रुंदीकरणाचा घाट घातला जात आहे. यासाठी पुन्हा नव्याने डीपीआरचे काम चालू असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

कंत्राटदार कंपनीचा हलगर्जीपणा

ऑट्रम घाटानंतर महामार्गाचा शेवटचा टप्पा असलेल्या चाळीसगाव ते धुळे दरम्यान धुळे चाळीसगाव हायवे प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीकडून ६७.३३१ किमीसाठी एक हजार कोटीतून सद्यस्थितीत काम चालू आहे. मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. 

प्रकल्प संचालकांचे आश्वासन खड्ड्यात

टेंडरनामाने या उखडलेल्या महामार्गाबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. दरम्यान एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी महामार्गातील सर्व्हिस रोड आणि मुख्य मार्ग उखडल्याची कबुली देत महामार्गाची पाहणी केली जाईल. तसेच उखडलेला भाग तातडीने दुरुस्त केला जाईल, असे दिलेले आश्वासन मात्र खड्ड्यात गेले आहे.