Sukhna River
Sukhna River Tendernama
मराठवाडा

सुखना नदीतील नळकांडी पुलांच्या दुरुस्ती केव्हा?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील महापालिका आणि ग्रामीण भागातून  वाहणाऱ्या सुखना नदीवरील (Sukhna River) नळकांडी, मोरी आणि पादचारी पुलांची दुरावस्था झाली आहे. कुठल्याही संरक्षक कठड्याविना असलेल्या या कमी उंचीचा पूल गेली कित्येक वर्षे वाहत्या पाण्यामुळे जीर्ण झाला आहे. परिणामी नदीकाठच्या गावातील दळणवळण विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे या भागातील नागरिकांनी 'टेंडरनामा'शी बोलतांना सांगितले. सुखना नदीवरील पुलांच्या पक्क्या बांधकामासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका आणि जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी नदीकाठच्या गावकऱ्यांची मागणी आहे. 

जर्जर झालेले छोटेखानी पूल, त्यात कोथळा बाहेर पडलेल्या भिंती, सुरक्षेचा उपाय म्हणून कठडे देखील नाहीत. पाईपात अडकलेला केरकचरा, पुलावर पडलेले खड्डे, उखडलेले काॅंक्रिट, त्यात दर पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी, अशा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या पुलांचे बांधकाम करण्यासाठी नदीकाठच्या लोकांनी लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र नेहमीप्रमाणे बांधकामासाठी प्रयत्न सुरू आहेत, निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, मंजूर होताच कामांना सुरवात करू, अशी उडवाउडवीची उत्तरे देत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नागरिकांची बोळवन करत असल्याचा आरोप गावागावातून केला जात आहे.

गत दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने हर्सुल - सावंगी पाझरतलाव ओव्हरफ्लो होताच सांडव्यातून सुखना नदीत पाणी सोडले जाते. त्यात पावसाचा जोर वाढताच पुलावर पाणी चढल्याने नदीकाठच्या लोकांचा संपर्क तुटतो. धक्कादायक म्हणजे गत अतिवृष्टीत पालिका हद्दीत चिकलठाणा ते शनिमंदिर दरम्यान चार लोकांना जलसमाधी मिळाल्यानंतर देखील संबंधित यंत्रणेला जाग येत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सोमवारी चिकलठाणा येथील अनेक ग्रामस्थांनी सुखना नदीवरील धोकादायक पुलांची कैफियत मांडल्यानंतर संबंधित प्रतिनिधीने थेट पळशी इथून प्रवासकरत कोलठाण, कृष्णापूर, पोखरी, पिसादेवी, नारेगाव, चौधरी कॉलनी, चिकलठाणा, झाल्टा, निपाणी, पिंप्रीराजा, भालगाव, डायगव्हाण, कोळघर, घारेगाव, वाकुळणी, भायगाव, देशगव्हाण, चिकणगाव, बाजार वाहेगाव, नानेगाव, साडेसावंगी या गावातील पुलांची पाहणी करत गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.