Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : आमदाराचा बोलबाला; गावकऱ्यांकडे मात्र कानाडोळा

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबाद तालुक्यातील सावंगी येथील फुलंब्रीच्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतून माती, मुरूमाची लाखो ब्रास चोरी झाली, जमिनीवर मोठमोठे खड्डे पडले. मात्र, तक्रार करून देखील चौकशी होत नसल्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिनाभरात चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आणि चौकशी देखील सुरू झाली.

मात्र, याच गावालगत नायगाव येथील गट क्र. १०७ मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध गौणखनिज उत्खनन करून सरकारी जमिनीचे तसेच आसपासच्या डोंगररांगांचे लचके तोडले जात आहेत. यासंदर्भात शेकडो शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन देखील महसूल प्रशासन जागचे हलत नाही. यामुळे महसूल प्रशासनाच्या दुटप्पी कारभारामुळे आमदाराचा बोलबाला, सामान्य गावकऱ्यांकडे कानाडोळा अशी चर्चा फुलंब्री वर्तुळात सुरू आहे.

फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखान्याची सावंगी येथे शेकडो एकर जमीन आहे. यातील कोट्यावधी रूपयाचे मुरूम आणि मातीची चोरी झाल्याने जमिनीचे नुकसान झाले. यासंदर्भात भाजप आमदार बागडे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. मुरूम माती आणि दगड चोरणाऱ्यांवर कार्यवाही करून त्याचा मोबदला कारखान्याच्या बँक खात्यात जमा करावा, जमिनीचे सपाटीकरण करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका महिन्यात विभागीय चौकशी करणार असल्याचे अधिवेशनात सांगितले. त्यामुळे आता कार्यवाही होणार असल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

ऐकेकाळी फुलंब्री तालुक्याचे वैभव असलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्षांपासून बंद आहे. आमदार हरिभाऊ बागडे कारखान्याचे सदस्य आहेत. आधी कारखान्यातीलच किमती साहित्याची चोरी झालेली. त्यात औरंगाबाद तालुक्यातील सावंगी शिवारात सुमारे दिडशे एकर जमीन कारखान्याच्या मालकीची होती. त्यातील २० एकर जमीन ही समृद्धी महामार्गात गेल्याने त्याचा मोबदला म्हणून कारखान्याला २७ कोटी रूपये मिळाला मात्र समृद्धी महामार्गाचे काम सुरू असतानाच अनधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता जमिनीतील लाखो ब्रास मुरूम उत्खनन होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले होते.

अखेर याच कारखान्याचे सदस्य व याच तालुक्याचे आमदार असलेल्या हरिभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशनात कारखान्याच्या मालकी हक्कातील जमिनीतून भरमसाठरित्या  गौणखनिजाची चोरी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. अवैध मुरूमाची वाहतूक करणार्यांवर कार्यवाही करून उत्खननाचा मोबदला कारखान्याच्या बँक खात्यात जमा करून जागेचे सपाटीकरण करण्याची मागणी केली. त्यावर महसूलमंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची एका महिन्यात विभागीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करून मोबदला वसूल करून मोबदला दिला जाईल व जमिनीचे सपाटीकरण केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जालन्याच्या महसूल विभागाने स्पाॅटपंचनामा करून चौकशी देखील सुरू केली आहे. लवकरच चौकशी अहवाल येऊन बागडेंच्या मागण्या देखील महसूल प्रशासन पूर्ण करणार आहे.

नायगावच्या शेतकऱ्यांचे काय?

याच गावालगत औरंगाबाद तालुक्यातील नायगाव येथील गट क्र. १०७ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तीन खदानींचे टेंडर काढण्यात आले. टेंडरनुसार खदानीचे ठिकाण हे समृद्धी महामार्गाच्या दक्षिणेला आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म विभाग समृद्धीच्या उत्तर बाजुला असलेल्या सरकारी जागा आणि त्यालगत असलेल्या डोंगरांकडे उत्खनन करणार्यांना बोट दाखवत आहे. नेमक्या याच बाजुला शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध असल्याने अद्याप क्रेशरचालकांना खदानींचा ताबा आणि वर्क ऑर्डर देखील दिले नसल्याचे स्वतः तहसिलदार कबुली देतात. असे असताना क्रेशरचालक खदानींमध्ये बोर ब्लास्ट करून अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणावर गौण खदानी आणि डोंगरांचे लचके तोडत आहेत. बोर ब्लास्टमुळे आजूबाजूच्या घरांनाही तडे जात आहेत. आवाजाने घरातील वस्तू कोसळत आहेत. दिवसरात्र वाहतूकीने उडणार्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे अतोनात नुकसान होत आहे. शेतांकडे जाणाऱ्या वाटा देखील खिंडारमय होत आहेत. खदानीलगतच चरण्यासाठी गेलेली गुरेढोरे खदानीत कोसळून मृत्युमुखी पडत आहेत.

जागेचा ताबा आणि परवाना मिळण्यापूर्वीच क्रेशर चालकांनी खदानी कुर्तडायला सुरूवात केली आहे हे विशेष. यासंदर्भात नायगाव आणि गावंदरी तांड्यासह शेकडो शेतकर्यांनी गौणखदानी कुरतडणाऱ्या व सरकारी जागेसह डोंगरांचे लचके तोडणाऱ्या क्रेशरचालकांच्या नावासह अनेकदा तक्रारी केल्या. मात्र तहसिलदार ज्योती पवार , उप विभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे तसेच मंडळ अधिकारी काळे , तलाठी सुक्ते राॅयल्टी लिपिक ढवळे यांच्याकडून गांभीर्याने विचार केला जात नाहीए. यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी कृष्णा घोडके यांच्या पत्रांना देखील महसूल विभाग जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणतात अधिकारी

नायगाव-भिकापूर हद्दीत जिल्हा प्रशासनामार्फत तीन खदानींचे टेंडर काढण्यात आले होते. यात सहभागी इच्छुक कंत्राटदारांना अद्याप जागेचा ताबा आणि वर्क ऑर्डर दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आम्ही भरारी पथक नेहमी पाठवतो. पण नेमक्या त्याच वेळेला ते पसार होतात. यापूर्वी मी स्वतः सात हायवा व एक ट्रॅक्टर जप्त केले होते. पुन्हा पथक पाठवून कार्यवाही करणार.

- ज्योती पवार, तहसिलदार 

काय म्हणतात शेतकरी

गावाच्या शेजारीच सावंगीतील देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे सदस्य आणि कारखान्याचे सदस्य आमदार हरिभाऊ बागडे यांनी जशी अनधिकृतरित्या मुरूमचोरीची विभागीय चौकशी लावण्यास भाग पाडले. तसाच आवाज त्यांनी मतदार संघातील आमच्या नायगावात होत असलेल्या अनधिकृत उत्खननाबाबत उठवावा. उत्खनन आणि धुळीमुळे आमच्या शेतातील पिकांचे आणि घरादाराचे नुकसान होत आहे. जनावरे खदानीत पडून मृत्युमुखी पडत आहेत. निदान महसूलमंत्र्यांनी जसे बागडेंच्या प्रश्नावर लगेच विभागीय चौकशी लावली. तसा थोडाफार विचार आमच्या गावाबाबत देखील करावा.

- समस्त गावकरी, नायगाव, भिकापूर, गावंदरीतांडा