bridge
bridge Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : धोकादायक पूल; न्यायालयाच्या आदेशानंतरही दुर्लक्ष

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील सर्व उड्डाणपुलांवर मर्यादेबाहेर डांबराचे आणि काँक्रिटचे थरावर थर ठेवल्याने पुलांच्या कठड्यांची उंची कमी झालेली आहे. याशिवाय डांबराचे थर आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवल्याने पुलांवर प्रमाणाबाहेर ओझे झाले आहे. परिणामी कोणतीही दुर्घटना घडू शकते,
पुलांवरून प्रवास करताना कठड्यांची कमी उंची पाहताच अपघाताच्या भीतीने प्रवाशांच्या दृदयाचे ठोके वाढतात यासंदर्भात महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी हे मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील सेव्हन हील, क्रांतीचौक, सिडको, मोंढानाका, महावीर चौक, संग्रामनगर हे उड्डाणपुल एमएसआरडीसीमार्फत बांधण्यात आले आहेत. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाले आहे. टाऊन हाॅल उड्डाणपुलाचे बांधकाम महापालिकेमार्फत झालेले आहे. सुंदरवाडी पुलाचे बांधकाम जागतिक बँक प्रकल्प शाखेमार्फत करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत टाऊन हाॅल व रेल्वेस्टेशन पुलाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आहे. सुंदरवाडी पुलाची जबाबदारी जागतीक बँक प्रकल्प शाखेकडे आहे. इतर सर्वच उड्डाणपुलांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागावर टाकण्यात आली आहे. मात्र, यातील सर्वच उड्डाणपुलांवर डांबराचे आणि काँक्रिटचे थर टाकून पूलांच्या कठड्यांची उंची प्रचंड कमी झालेली आहे. शिवाय या प्रकारामुळे पूलाच्या बीम आणि काॅलमवर प्रंचंड ओझे वाढल्याने अधिकचा धोका वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जागतिक बँक प्रकल्प शाखेने थेट पूलावर काँक्रिटचे थरावर थर ठेवल्याने येथील जुन्या पूलाच्या बीम आणि काॅलमवर काँक्रिटच्या ओझ्याचा मोठा ताण वाढलाय. यात मोठ्या प्रमाणात पूलाच्या कठड्याची उंची कमी झालेली आहे, असे असताना प्रशासन काय मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय का, असा सवाल छत्रपती संभाजीनगरकरांमधुन विचारला जातोय. उड्डाणपुलांवर गरजेपेक्षा जास्त डांबराचे व काँक्रिटचे थर टाकण्यात आल्यामुळे पुलांवरील ओझे वाढले असून ते धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे

यासंदर्भात टेंडरनामाने काही तज्ज्ञांना विचारले असता, पुलावरील डांबराचा थर ६५ एमएमपेक्षा जास्त नसावा. जर पहिला थर खड्डेमय झाला असेल, तर तो पूर्णपणे काढून दुसरा थर टाकण्यात यावा. पहिला थर पूर्णपणे काढून टाकल्याशिवाय दुसरा थर टाकण्यास मंजुरी मिळतच नाही, असे असताना नियम धाब्यावर ठेवत शहरातील उड्डाणपुलांवर मर्यादेपेक्षा अधिक एमएमचे थरावर थर टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्यानुसार पुलांच्या देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.