paithan
paithan rendernama
मराठवाडा

Paithan : संत ज्ञानेश्वर उद्यान विकास आराखड्याला ग्रीन सिग्नल; आता पर्यटन विभागाकडून दप्तर दिरंगाई नको

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील बहुचर्चित पण गत दोन दशकापासून विकासाची प्रतिक्षा असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत जलसंपदा विभागाच्या जायकवाडी प्रकल्पांने ठाण्यातील जागतिक दर्जाच्या फ्रूट्रिक्स कंपनीच्या प्रकल्प सल्लागाराकडून दीडशे कोटीचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला सोमवारी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी हिरवा कंदील दाखवत मान्यता दिली आहे.

एक महिन्याच्या आत राज्याच्या पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री भुमरे व जिल्हाधिकारी पांण्डेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र आता पर्यटन विभागाने दप्तर दिरंगाई न केल्यास या उद्यानाचा लवकरच कायापालट होण्याचा मार्ग मोकळा होईल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा श्रीनगर येथील निशांत गार्डन आणि दिल्ली येथील अमृत गार्डनच्या धर्तीवर संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी ठाण्यातील जागतीक दर्जाच्या फुट्रिक्स या प्रकल्प सल्लागार कंपनीकडून दीडशे कोटीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

सोमवारी (ता. ९) सदर प्रकल्प सल्लागार प्रतिनिधींसह जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संदिपान भुमरे व जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता जयंत गौरी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बिनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप विभागीय अभियंता दिपक डोंगरे व शाखा अभियंता तुषार विसपूते यांनी सदर जागतिक स्तरावरील सल्लागार कंपनीकडून उद्यानाचा  नावीन्यपूर्ण कल्पना तयार करून केलेल्या सविस्तर प्रकल्प विकास आराखडयाचे पाॅवर पाॅईंट प्रेझेंट स्टेशनमार्फत सादरीकरण करण्यात आले.

त्याला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी एकमताने सहमती दर्शवली व आराखड्यास मान्यता दिली. तसेच एका महिन्याच्या आत  राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय मान्यता घ्या, असे निर्देश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सोमवारी दिले.

पैठणला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या ठिकाणी जायकवाडीसारखे देशातले मोठे धरण आहे. यामुळे श्रीनगरच्या निशांत आणि दिल्लीच्या अमृत गार्डनच्या धर्तीवर संत  ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक दर्जाचे उद्यान याठिकाणी बनवन्याचा माणस आहे. यासाठी संपूर्ण उद्यानाचे नुतनीकरण, मुख्य प्रवेशद्धाराचे सुशोभिकरण, चिमुकल्यांसाठी ट्रेन, पैठणी हब, मिनी ॲम्पीथिऐटर, वाॅटरपार्क, बोटींग, पार्कींग, शाॅपिंग माॅल, मुख्य प्रशासकीय ईमारत, थीमपार्क, ऐतिहासिक लुक देणाऱ्या भिंती, मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणे त्यावर कोरली जाणार आहेत. पर्यटक निवासस्थाने, प्रतिक्षालये बांधली जाणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात खेळण्या व लेझर शो रोवले जाणार आहेत.

आता एका महिन्यात राज्याच्या  पर्यटन विभागाकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेण्यासाठी विकास आराखडा रवाना करण्याच्या जलद हालचाली जायकवाडी प्रकल्पाने सुरू केल्या आहेत. यानंतर जलसंपदा विभागाची तांत्रिक मान्यता घेतली जाईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर उद्यानासारखी मोठी जागा विकसित करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील फुट्रीक्स याच प्रकल्प सल्लगारामार्फत विकास कामे केली जातील अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

आता सुमारे २०० एकर जागेवर हे उद्यान आहे. सौंदर्यीकरणासाठी १५० कोटींचा प्रस्तावाला तातडीने पर्यटन विभागाने दप्तर दिरंगाई न करता मंजुरी दिल्यास खऱ्या अर्थाने या उद्यानाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.