Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : गडकरींकडून आश्वासनांचा सुकाळ; अंमलबजावणीचा दुष्काळ

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जळगावहून औरंगाबाद शहरात येणाऱ्या नागरिकांची हर्सूल गावातुन वळसा घालत ये-जा करण्यापासून कायमची सुटका व्हावी. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून सावंगी ते मिटमिटा असा नवीन बायपास तयार करण्याचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत प्रस्तावित केले होत. या प्रस्तावित बायपासच्या प्रकल्पामुळे जळगावसह अजिंठा, धुळे आणि समृद्धी महामार्गाहून नागपूरहून येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. तर वेरूळ, नाशिक, पुणे येथे जाणाऱ्यांना शहरात येण्याची गरजच भासणार नाही. मात्र, इतका चांगला हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे. एकूणच निवडणुकीच्या काळात येणाऱ्या गडकरींकडून छत्रपती जिल्ह्याला  केवळ आश्वासनांचा सुकाळ दाखवला जातो. मात्र, त्याच्या अंमलबजावणीचा दुष्काळ निर्माण होतो, असेच या प्रकल्पावरून समोर आलेले आहे. 

औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात हर्सूल गावातील अरुंद रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही प्रस्तावित काम पुर्ण करण्यात आले. यात सध्याचा ३० मीटरचा रस्ता ४०० मीटर रुंद केला केला गेला आहे. मात्र अद्याप जमीनधारकांना जागेचा मोबदल्यापोटी १७.७२ कोटी रुपये देणे शिल्लक असल्याचे येथील मालमत्ताधारकांचे मत आहे. रूंदीकरण झाल्याने या रस्त्यामुळे जळगाव रोडवरून शहरात येणाऱ्या वाहनांना हर्सूल गावातील अरुंद रस्त्याचा त्रास कमी झाला. मात्र, जळगाव रोडवरून येणाऱ्या ज्या वाहनांना शहरात न येता वाळूज, नाशिक, पुणे, मुंबईला जायचे आहे त्यांच्यासाठी सावंगी ते मिटमिटा नवीन बायपासचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार केला आहे. जळगाव रोडचे कामही हाच विभाग करतोय.

बारा किलोमीटरचा सावंगी-मिटमिटा बायपास जळगाव रोडवरील सावंगी येथील टोलनाक्यापुढील नायगाव जंक्शनहून उजवीकडचा रस्ता केंब्रिज चौकाकडे जातो, तर डावीकडचा रस्ता नायगाव येथे जातो. नवीन बायपास येथूनच प्रस्तावित आहे. येथे जागतिक बँक प्रकल्पांतर्गत सावंगी ते बीड बायपास हा  बांधलेला एक रस्ता आहे. नायगावहून सुरू होणारा बायपास मिटमिटा येथील फौजी ढाब्यामागे प्रस्तावित सफारी पार्कजवळ निघेल आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ ला येऊन मिळेल. चारपदरी आणि ४५ मीटरची रुंदी असणाऱ्या रस्त्याची लांबी सुमारे १२ ते १५ किलोमीटर असेल. यासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याच्या अंदाजपत्रकासह  राष्ट्रीय महामार्ग विभागाने वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला होता.

कधी होणार प्रकल्प

आधी या रस्त्याचा प्रस्ताव जागतिक बँक विभागाकडे होता. मात्र, त्यांच्याकडे निधी नसल्याने तब्बल पंधरा वर्षाच्या रखडगाथा नंतर या बायपा राष्ट्रीय महामार्गाकडे हे काम आले. विभागाच्या वार्षिक नियोजन आराखड्यात या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र निधी अभावी अद्याप त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी टेंडर काढण्यात आले नाही. ही प्रक्रीया तातडीने झाली  तर येत्या काही वर्षांत नवीन बायपास तयार होईल. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल. नवीन बीड बायपासनंतर हा दुसरा बायपास असेल.जेणेकरून समृध्दी महामार्ग आणि धुळे - सोलापुर हायवेला हा बायपास मिळवता येईल.

शहरातील वाहतुकीचा भार टळेल

जळगाव, धुळे, नाशिक येथून पुणे, मुंबईला जाणाऱ्या वाहनांना शहरातून नाहक जावे लागते. त्यांना हर्सूल गावातुन ये-जा करावी लागते. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यावर सध्याच्या परिस्थितीत नागपूरहून वेरूळ, पुण्याला जाणाऱ्यांना सावंगी येथील इंटरचेंजला उतरून औरंगाबाद शहरातूनच पुढे जावे लागणार आहे. नवीन बायपास झाल्यास त्यांना परस्पर जाता येईल. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताणही वाचणार आहे.