Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद:नव्या जलवाहिनीचे काम कोमात अन् जुन्या वाहिनीवर खर्च जोमात

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (MIDC) जीर्ण आणि शीर्ण झालेल्या जुनाट जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी लाखोंचा उधळपट्टीचा खर्च सुरूच आहे. मात्र नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी तिजोरीत पैसा असताना आधी टेंडर प्रक्रिया राबवण्यासाठी कागदी घोडे नाचवले. त्यात टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या ठेकेदाराने दीड वर्षापूर्वी काम सुरू केले. मात्र, काम अत्यंत कासवगतीने करणाऱ्या ठेकेदाराला अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे दिसत आहे. नव्या जलवाहिनेच काम तातडीने पूर्ण केल्यास जुन्या जलवाहिनीवरील लाखोचा खर्च वाचणार आहे. शिवाय उद्योजकांना देखील मुबलक पाणी मिळणार. मात्र याकडे अधिकारी जाणूनबूजून दुर्लक्ष करीत असल्याचा संशय बळावत आहे.

शहरातील शहानुरवाडी उड्डाणपुलाच्या उतारावरच बीड बायपासकडे जाताना ७०० मि.मी. व्यासाच्या ४० वर्ष जुन्य मृद पोलादी शुध्दजल उदंचन जलवाहिनीला गेल्या पंधरा दिवसापासून गळती लागली होती. टेंडरनामाने सचित्र अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. मात्र, याच जलवाहिनीच्या शेजारी मनपाची देखील जलवाहिनी असल्याने नेमकी कोणती जलवाहिनी फुटली याचा शोध घेण्यात अधिकाऱ्यांनी वेळ लावला. अखेर एमआयडीसीने जलवाहिनीचे व्हाॅल्व्ह बंद केल्याने गळती कमी झाली. तेव्हा जलवाहिनी एमआयडीसीचीच फुटल्याचे निश्चित झाले. यानंतर अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून गळती बंद करण्यासाठी व जलवाहिनी दुरूस्तीचे काम करण्यासाठी चार दिवसाची परवानगी मागितली यात आठ दिवसानंतर परवानगी मिळाली. गुरूवारी ता. (१५ डिसेंबर ) पासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.

दिड ते दोन लाखांची उधळपट्टी

यासाठी चार मीटर खोदकामासाठी १२०० रूपये प्रति तासासाठी ब्रेकर, ९०० रूपये प्रतितासासाठी जेसीबी, ५०० रूपये प्रतितासासाठी डिझेल इंजिन तसेच ३ हजार रूपये प्रतितासासाठी चक्क पोकलॅन्ड आदी यंत्रणा सज्ज करण्यात आली. दुरूस्तीसाठी जवळपास चार दिवसात दिड ते दोन लाख रूपये खर्च येणार आहे. यापूर्वी वर्षभरात विविध ठिकाणी या जुनाट जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी तब्बल तीस ते चाळीस लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

नव्या जलवाहिनीचे काम कासवगतीने

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र नवीन जलवाहिनीचा (फीडर लाइन) प्रस्ताव दिला होता. त्यास १० एप्रिल २०२० मध्ये मंजुरी मिळाली होती. वाल्मीगेट ते चिकलठाणा जलधारा हाऊसिंग सोसायटी पंप हाऊस या एकूण २० किलोमीटरच्या नवीन पाइपलाइनसाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, याकामासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यास एमआयडीसीने कागदी घोडे नाचवत विलंब केला. वर्षभराच्या विश्रांतीनंतर अधिकाऱ्यांनी प्रशासकिय कामकाज पूर्ण करत २७ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबादेतील रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीला याकामाची वर्कऑर्डर देण्यात आली. मुळात २०२० मध्ये अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करून तांत्रिक तपासणी देखील केली होती. प्रत्यक्षात त्याचवेळी टेंडर काढून तीन महिन्यात ठेकेदाराची नियुक्ती करून हे काम  पूर्ण करणे अपेक्षित होते. वर्कऑर्डर मिळाल्यानंतर रुद्राणी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून १५ महिन्यात केवळ १५ किमी नवीन जलवाहिनी अंथरण्याचे काम झाले. अद्याप पाच किमीचे काम बाकी आहे. 

चिकलठाणा एमआयडीसीला वाळूज एमआयडीसी पाणीपुरवठा केंद्रातून पाणी पुरविले जाते. ही जलवाहिनी ४० वर्षापूर्वी टाकण्यात आलेली आहे. कालबाह्य झालेली ही जलवाहिनी अत्यंत जुनी व जीर्ण झाली आहे. वारंवार फुटत असल्याने अडचणी तर येतातच, शिवाय दरवर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी ३० ते ४० लाखाचा खर्च येतो. या अडचणी दूर करण्यासाठी ३० कोटींच्या नवीन जलवाहिनीचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वीच मंजूर झाला आहे. वाळूज ते चिकलठाणा औरंगाबादच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या या जलवाहिनीचे २० किलोमीटरचे अंतर आहे. सद्यस्थितीत जुन्या जलवाहिनीचा वाळूज-पैठण लिंक रोड, वाल्मी-बीड बायपास-संग्रामनगर उड्डाणपूल-चाणक्यपुरी-क्रीडा संकुल-गजानन महाराज मंदिर-जालना रोड मार्गे चिकलठाणा वसाहत असा मार्ग आहे. मात्र शहरात नव्याने झालेले सिमेंट रस्ते; जालना रस्त्याचे खोदकाम करण्याची वेळ येणार नाही यासाठी नवीन प्रस्तावात वाळूज - पैठण लिंक रोड - वाल्मी नाका-नाथ व्हॅली शाळा - सुधाकर नगर - मधुबन हॉटेल - बाळापूर फाटा ते मुकूंदवाडी जंक्शन आणि चिकलठाणा एमआयडीसी असा मार्ग प्रस्तावित आहे. सद्यस्थितील वाल्मीगेट ते बीडबायपास रोडवरील हाॅटेल मधुबन पर्यंत ठेकेदाराने काम पूर्ण केले आहे. 

लाखोची उधळपट्टी उद्योजकांना त्रास

सध्याच्या जुनाट जलवाहिनीतून चिकलठाणा एमआयडीसीत रोज १५ एमएलडी पाणी आणले जाते. त्यातून काही रुग्णालये, सरकारी कार्यालये, हॉटेल यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने दुरूस्तीसाठी वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने या जलवाहिनीवरील लाखो ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहेत.