Mahavitran
Mahavitran Tendernama
मराठवाडा

ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारताच सदोष मीटर रिडींगचे घटले प्रमाण

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : चुकीच्या पद्धतीने मीटर रिडींग घेऊन ग्राहकांच्या माथी मनमानी वीज बील आकारणाऱ्या ठेकेदारांच्या मीटर रिडींग एजन्सींच्या अनागोंदी कारभारावर टेंडरनामाने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी वृत्तमालिकेची दखल घेत धडक कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे सदोष मीटर रिडींगचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत घटल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.

चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मन:स्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान यावर टेंडरनामाने प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेची महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चांगलीच दखल घेतल्यामुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली असून, एप्रिल ते जून २०२२ या ३ महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल ३ टक्क्यांनी (८२५ दशलक्ष युनिट) वाढ झाली असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.

उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मात्र टेंडरमधील नियम व अटी धाब्यावर बसवत काही एजन्सीज चूकीची मीटर रिडींग घेणे, दुरूस्तीसाठी गेलेल्या ग्राहकाच्या वीजबीलात सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रिडींग घेणे याप्रकारावर टेंडरनामाने प्रहार करताच मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कारवाईचा धडाका सुरू करीत राज्यातील तब्बल ८० मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ केले. तसेच महावितरणच्या ५१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांनी गांभिर्याने विविध उपाययोजना सुरू केल्याचा धसका घेत मागच्याच ठेच... पुढे शहाणा याप्रमाणे एजन्सीज आणि अधिकाऱ्यांमुळे आता वीजमीटरचे रीडिंग अचूक होत असल्याचे प्रमाण वाढले आहे.

आता महावितरणचे एकच लक्ष

महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी आमुलाग्र सुधारणा सुरू आहेत. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलिंगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे.

सिंघल यांच्या प्रयत्नांना यश

त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. तसेच वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समज देखील या एजन्सींजना देण्यात आली आहे.

असा होईल फायदा

अचुक मीटर रिडींगमुळे महावितरणच्या महसुलासोबतच वीज वितरण हानीत देखील मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट वीज ग्राहकांना होणार असून, वीजहानीपोटी त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड देखील कमी होणार आहे. याशिवाय वीज बिलासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.