Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
मराठवाडा

नव्या बायपासच्या खड्ड्यांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लक्ष देतील का?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाई परिसरातील नव्या बीड बायपास रोडचे (New Beed Bypass) काम २१ नोव्हेंबर २०२३  अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. मात्र शहराबाहेरून म्हणजे आडगाव ते करोडी असा 30 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर तीनच वर्षांत मोठमोठे खड्डे पडले. दरम्यान, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने गेल्या दोन वर्षांपासून कांचनवाडी ते सातारा-देवळाई फाट्यादरम्यान जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. अद्याप त्याची दुरूस्ती न केल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. याकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान इतर दुरूस्तीकडे कानाडोळा करत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आडगाव-निपानी अंडर बायपासखाली गेल्या महिन्यापासून रस्ता अडवल्याने पुलाखालून जाणारी वाट अरूंद झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे काम पूर्ण होऊन तीन वर्षाचा काळ लोटला नसताना या महामार्गावर खड्डे कसे, असा सवाल करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लक्ष देतील काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-५२ या मार्गावरील नवा बीडबायपास रोड हा आडगाव ते करोडी असा ३० किमी लांबीचा आहे. त्याचा मार्ग आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडा असा आहे. या  बायपासचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र कंत्राटदारामार्फत सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने ३० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर आणि रस्त्यावरील लहान-मोठे एकूण ११२ पूलांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. तसेच कांचनवाडी, एएस क्लब येथील उड्डाणपूलाखालचे रस्तेही उखडले. या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ६१३ कोटी रुपये इतका खर्च झालेला असताना कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रस्ताही उखडला.

दरम्यान आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथील भुयारी मार्गात खड्ड्यात पाणी साचल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. खड्ड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात  या रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातदेखील घडत आहेत.त्यात या रस्त्याबाबत तक्रारी वाढल्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कंत्राटदाराला तंबी देत थातुरमातुर दुरूस्ती करत रस्ते अडवून ठेवत असल्याने अधीक कोंडीचा त्रास सोसावा लागत आहे. केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते या रस्त्याचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. निदान आता रस्त्याच्या दुरूस्तीकडे त्यांनी लक्ष द्यावे , अशी माफक अपेक्षा प्रवासी बोलून दाखवत आहेत.