Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: 20 वर्षांपासून रखडलेल्या 'या' रस्त्याचे काम सुरू होणार

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या २० वर्षांपासून चर्चेत असलेल्या पैठण-औरंगाबाद रस्ता चौपदरीकरणाचे काम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्याची खास माहिती  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली. मात्र, आमच्या मागणीला फाटा देत हे काम कसे सुरू करणार, असे म्हणत सोमवारी पून्हा अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे वाघचौरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद-पैठण रस्ता चौपदरीकरणाचे कंत्राट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ तथा भाजपचे जालना जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे हे जाॅईंट व्हेंचर असलेल्या ओजेएससी एव्हरस्काॅन या कंपनीला मिळाले आहे. इतर बारा कंपन्यांपेक्षा त्यांनी तब्बल ४१.२ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने हे काम त्यांच्या पदरात पडले आहे.

४९० कोटीचे काम होणार २८९ कोटीत

हा रस्ता बांधकामाच्या एकूण ४९० कोटी एवढे टेंडर रकमेतून केवळ २८९ कोटीतून या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. यासंदर्भात कंत्राटदार सिध्दार्थ शेट्टी यांना विचारले असता विभागाने लवकरात लवकर वर्कऑर्डर दिलीतर काम आठ दिवसात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागाने सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.Thane

माजी आमदारांच्या मागणीला फाटा 

जर हा रस्ता इतक्या कमी रकमेतून होणार असेल तर इतके पाचशे कोटीचे अंदाजपत्रक कसे , इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरले तर कंत्राटदार काम योग्य दर्जाचे करणार कसे, तसेच थेट दानवेंच्याच भावाला कंत्राट कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित करत पैठण तालुक्याचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र, विभागाने त्यांच्या एकाही पत्राची दखल घेतली नाही. यासंदर्भात वाघचौरेंना कळवले देखील नाही. आता सोमवारी पुन्हा पत्र देणार असल्याचे त्यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, तब्बल तीन महिन्यानंतर संबंधित कंपनीकडून बँक गॅरंटी, सुरक्षा अनामत रक्कम भरून घेण्याची कारवाई झाली असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले यांनी टेंडरनामाशी बोलताना स्पष्ट केले. ओसीएससी एव्हरकाॅन कंपनीला काम मिळताच माजी आमदार संजय वाघचौरे यांना रस्ता बांधकामाची काळजी पडली आणि एवढ्या कमी दरात दर्जेदार काम कसे होईल? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दानवे हे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ असल्याने वशिल्यात काम मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, टेंडर प्रक्रिया ही ऑनलाईन असते, यात गोपनीय बाबी कुणालाही कळत नाहीत. त्यामुळे मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचा पदाधिकारी असलो तरी कामात कुठेही तडजोड करणार नाही बांधकाम दर्जेदारच असेल असे प्रतिउत्तर वाघचौरे यांना त्यांनी दिले होते. मात्र, वाघचौरे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.