Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: उद्घाटन फलकावर डांबरीकरण; रस्त्यावर फक्त खडी अन् खड्डे

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : शहानूरवाडी वार्ड क्रमांक १०९ येथील देव इंद्रायनी हाउसिंग सोसायटी ते राजगुरूनगर रस्ता गेल्या सात वर्गापासून दयनीय अवस्थेत आहे, रस्ता खड्डेमय (Potholes) झालेला आहे, हा रस्ता तब्बल ५० ते ६० वसाहतींना जोडणारा आणि दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवाशी रहदारी करतात, प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या मणक्याच्या आजार जडला आहे. या भागातील लोकप्रतिनिधीनी या रास्त्याच्या कामचं उदघाटन केल. सोसायटीत फलक लावला. त्यावर खडीकरण - मजबुतीकरण व डांबरीकरण असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र रस्त्यावर डांबरीकरण झाले नाही.

या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी येथील नागरिकांनी अनेकवेळा महापालिकेचे उंबरठे झिजवले. त्याच्या दीर्घकाळानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. तब्बल ३० ते ३५ वर्षांनंतर या रस्त्याचे काम झाले खरे, मात्र कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यातही खडीकरण व मजबुतीकरण उखडून रस्त्याची पार चाळणी झालेली आहे. डांबरीकरण केलेच नसल्याने डांबराचा निधी कोणी लुटला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सात वर्षापूर्वी उपरोक्त रस्त्यावर मुरूम आणि खडी अंथरली. त्यावर डांबरचा नुसता फवारा मारला. सद्यस्थितीत रस्त्यावर अंथरलेली खडी निघून खड्डे पडलेले आहेत. कारण डांबर टाकलेच गेले नाही. झालेले काम देखील दर्जेदार नसल्याने आता या  रस्त्याचे तीन तेरा वाजलेत. त्यामुळे महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी या रस्त्याची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी वाहन धारकांकडून केली जात आहे.

याबाबत माजी नगरसेविका शोभा बुरांडे यांना विचारणा केली असता त्यांच्यावतीने प्रदिप बुरांडे म्हणाले की, हा कच्चा रस्ता होता. १८ ते २० लाखाचे टेंडर होते. काम करून सात वर्ष झाले. फलकावर चुकून डांबरीकरण असा उल्लेख टाकला गेला. मुळात या  रस्त्याच्या अंदाजपत्रकात केवळ खडीकरण व मजबुतीकरणच होते, डांबरीकरण नव्हते.

आता या रस्त्याचे नवीन टेंडर निघाले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काॅंक्रिट रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे ते म्हणाले